पंतप्रधान इंदिरा गांधी प्रश्न सोडवतील, न्याय देतील!
मुंबई, ता. 18 – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक म्हणाले, “महाराष्ट्र व म्हैसूरच्या मुख्यमंत्र्यांनी सीमा प्रकरणी चर्चा करून काहीही निष्पन्न होणार नाही. म्हणून पंतप्रधान इंदिरा गांधींनी हस्तक्षेप करावा, असे मी सुचविले आहे.’
पत्रकारांशी बोलताना नाईक पुढे म्हणाले, असे आहे तरी पंतप्रधान इंदिरा गांधी म्हणाल्या की, “दोन्ही मुख्यमत्रंयांनी वाटाघाटी कराव्यात, तर त्यासही माझी तयारी आहे.’ नाईक पुढे म्हणाले, “इंदिरा गांधींना प्रश्न ठाऊक आहेत. न्याय कसा करावा ठाऊक आहे.
त्या न्याय देतील! हा प्रश्न आपण राजकीय म्हणून हाताळू नये. हा मानवतेचा प्रश्न आहे. असे प्रश्न सोडवण्याची क्षमता पंतप्रधानांच्या ठायी आहे.’ एका प्रश्नाला उत्तर देताना नाईक म्हणाले,
“या प्रश्नाची सारी हकिकत इंदिराजींना ठाऊक आहे. प्रश्न सोडविण्यासाठी त्या उत्सुक आहेत. सीमा प्रश्नावर नवा तोडगा सुचविलेला नाही. मी नुकतीच याविषयी केंद्रीय नेत्यांशी चर्चा केली.
हुंडा पद्धतीविरुद्ध चळवळ
पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली समाजाचे अधिवेशन अलीकडेच अहमदनगर येथे पार पडले. या अधिवेशनात इतर ठरावांबरोबरच विवाहविषयक एक ठराव मंजूर करण्यात आला. त्या ठरावात म्हटले आहे की, “समाजातील लग्न समारंभ साधेपणाने व्हावेत.
हुंडा पद्धती बंद करावी आणि सामुदायिक विवाहांना उत्तेजन द्यावे यासाठी समाज संस्थांनी प्रयत्न करावेत. प्रसंगी सत्याग्रहाच्या मार्गाचा अवलंब करून ही प्रवृत्ती बंद पाडावी. एका समाजाच्या संघटनेने हा ठराव करावा, ही अभिनंदनीय बाब आहे.
असे ठराव होतात पण या ठरावात प्रत्यक्ष कृती करण्याचा आदेश दिला आहे. हुंडा पद्धतीविरुद्ध सारेच ओरडतात. पण प्रत्यक्ष कृती कुणीच करू शकत नाही. केवळ हुंडा दिला म्हणजे एकेकाळी मुलीचा बाप मोकळा होई.
आता तसेही नाही. लग्न थाटात करून द्यावे लागते. मुलाची हौस पुरवावी लागते. या विरुद्ध कुणीही काही बोलत नाही. विवाहानिमित्त वैभवाचे प्रदर्शन करण्याची एक फॅशन निघाली आहे, ती बंद व्हावी. ती उधळमाधळ सुद्धा थांबली पाहिजे.