नवी दिल्ली/ पाटणा – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पुढाकाराने बिहारमध्ये 12 जून रोजी विरोधी पक्षांच्या नेत्यांची एक संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र ही बैठक आता टळली आहे. कॉंग्रेसचे प्रमुख नेते त्या दिवशी अन्य कार्यक्रमांमध्ये व्यस्त असल्यामुळे ते उपस्थित राहू शकत नव्हते. त्यामुळेच तूर्त ही बैठक होणार नसल्याचे चित्र आहे.
राहुल गांधी सध्या विदेश दौऱ्यावर आहेत. त्यामुळे ही बैठक 20 जून नंतर घेतली जावी अशी कॉंग्रेसची इच्छा होती. पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल या दोघांनाही बैठकीत सहभागी व्हायचे आहे. मात्र नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाने स्वत: पुढाकार घेत अन्य विरोधी पक्षनेत्यांची भेट घेत बैठकीची 12 जून तारीख घोषित करून टाकली.
सूत्रांनी एका इंग्रजी संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की 12 जूनचा दिवस द्रमुक आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांच्यासाठीही सोयीचा नव्हता. दरम्यान, जनता दलातर्फे तारीख जाहीर केली गेल्यानंतर कॉंग्रेसकडून खर्गे यांच्या अनुपस्थितीबाबत स्पष्ट संकेत देण्यात आले होते. पक्षाचा कोणीतरी प्रतिनिधी सहभागी होईल असे सांगण्यात आले. कॉंग्रेसचे सरकार असलेल्या एखाद्या राज्यातील मुख्यमंत्री सहभागी होऊ शकतात असे सूचित केले गेले होते.
राहुल गांधी 18 जून रोजी भारतात परतणार आहेत. त्यामुळे आता 20 जून किंवा 23 जून रोजी बैठक होण्याची शक्यता असल्याचे जनता दलाकडून विरोधी पक्षनेत्यांना कळवण्यात आले आहे. भाजपविरोधी आघाडीत कॉंग्रेसचीच भूमिका महत्वाची राहणार आहे, कारण आघाडीत सहभागी होणाऱ्या जवळपास सगळ्यांच पक्षांचे केवळ एकेका राज्यापुरतेच अपिल आहे. कॉंग्रेस मात्र देशातील सर्व राज्यात भाजपसमोर पर्याय असणार आहे. त्यामुळे विरोधकांच्या कोणत्याही प्रयत्नांकडे जर कॉंग्रेसने पाठ फिरवली तर त्या प्रयत्नांना काहीही अर्थ राहणार नाही.
याची दुसरी बाजू अशीही आहे की नितीश जरी पुढाकार घेत असले तरी संयुक्त आघाडीत मध्यवर्ती स्थान कॉंग्रेसलाच असले पाहिजे अशी त्या पक्षाची इच्छा आहे व त्यांनी ती बोलून दाखवली नसली तरी विरोधी पक्षांनी हा संकेत पाळावा असेच कॉंग्रेसला वाटते आहे. त्याचवेळी काही पक्षांना मात्र कॉंग्रेसकेंद्रीत आघाडी नको आहे याची कॉंग्रेसलाही कल्पना असल्यामुळे कॉंग्रेसच्याच मर्जिखातर नितीश सक्रिय झाले असावेत असेही मानले जाते.
सगळ्यांनीच एकत्र यावे आणि भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात एकच संयुक्त उमेदवार द्यावा असे अनेक जणांना वाटते आहे. मात्र प्रत्यक्षात असे करण्यात मोठी आव्हानेही आहेत. स्वत: राहुल गांधी यांनीच अलिकडे तसे सूतोवाच केले होते. विरोधकांच्या एकीची प्रक्रिया थोडे किचकट काम आहे. कारण अशी अनेक ठिकाणे आहेत की जेथे आमची विरोधी पक्षांशीही स्पर्धा सुरू आहे. त्यामुळे थोडी देवाण-घेवाण झाली पाहिजे आणि तसे होईल असा आपल्याला विश्वास असल्याचेही राहुल म्हणाले होते.