सांगली – लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झालेल्या असल्या तरी अद्यापही मविआचा जागा वाटपाचा तिढा कायम आहे. मागील दोन महिन्यापासून मविआमध्ये जागावाटपासंदर्भात बैठका होत आहेत. परंतु, सांगली लोकसभा मतदरासंघामुळे कॉंग्रेस आणि ठाकरे गटात तू-तू, मै-मै सुरू झाली असून यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी सांगली येथील सभेतून ठाकरे गटाकडून उमेदवाराची घोषणा केली. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे.
त्यामुळे आता चंद्रहार पाटील प्रचाराला लागले आहेत. पंरतु, उद्धव ठाकरेंच्या याच घोषणेनंतर महाविकास आघाडीत तणाव निर्माण झाला आहे. ठाकरेंनी सांगलीचा उमेदवार जाहीर केल्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली असून अशा पद्धतीने नाव जाहीर करणे योग्य नाही, असे नाना पटोले यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.
नाना पटोले म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी सांगलीमध्ये एकतर्फी उमेदवारी जाहीर करणे हे अडचणीचे झाले आहे. महाविकास आघाडीमध्ये हे व्हायला नको. एकीकडे चर्चा चालू असताना दुसरीकडे त्या जागेवर नाव जाहीर करायला नको होते. उद्धव ठाकरे यांनी अशा पद्धतीने नाव जाहीर करणे योग्य झालेले नाही, असे त्यांनी सांगितले.