आळंदी – करोनाच्या पार्श्वभूमीवर सोमवार (दि. 13) ते सोमवार (दि. 13) या कालावधीत आळंदी शहर लॉकडाऊन करण्यात येणार आहे. तसेच प्रातांधिकारी संजय तेली यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे नागरिकांना सकाळी 6 ते रात्री 9 पर्यंत आपल्या कार्यक्षेत्रात विनाकारण घराबाहेर फिरण्यासाठी निर्बंध घालण्यात आले आहे, अशी माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी दिली.
याकाळात कोणत्याही अत्यावश्यक सेवा बंद राहणार नाही, शासकीय कार्यालये, दवाखाने, बॅंका, पतसंस्था, मेडिकल सुरू राहतील, कंटेन्मेंट झोन वगळता सर्व कामगार आणि कर्मचाऱ्यांना कामावर जाता येईल, किराणा, भाजीपाला आणि दुधाची दुकाने सकाळी 7 ते दुपारी 1 पर्यंत सुरू ठेवण्यात येईल.
तसेच इतर दुकाने आठ दिवस पूर्णपणे बंद राहतील. तसेच मंगल कार्यालयात लग्न लावता येणार नाही. तसेच लॉकडाऊन संपल्यानंतर स्थानिक पोलीस प्रशासनाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. मास्क वापरणे बंधनकारक आहे अन्यथा 500 रुपये दंडात्मक कारवाई केली जाईल.
ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना बाहेर फिरण्यासाठी मनाई आहे, शहरातील सर्व नागरिकांना करोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे, असे भूमकर यांनी नमूद केले.