मंचर -जिल्हा अधिकारी पुणे तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण पुणे यांच्या आदेशान्वये करोनाच्या आजाराच्या अनुषंगाने नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून श्रीक्षेत्र भीमाशंकर आणि आंबेगाव तालुक्यातील इतर पर्यटनस्थळी जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. भविष्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी कोणत्याही व्यक्तीने नियमांचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांनी सांगितले.
श्रीक्षेत्र भीमाशंकर, डिंभे धरण आणि इतर परिसरातील पर्यटन व देवदर्शनावर भाविक व पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. घोडेगाव पोलिसांनी महत्त्वाचे रस्ते व पर्यटनस्थळांवर आदेशाची माहिती देणारे सूचना फलक लावले आहेत. या आदेशाचे कोणत्याही व्यक्तीने उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. मुंबई, पुणे आणि इतर राज्यांतून पावसाळी पर्यटनाचे मुख्य आकर्षण असलेल्या आणि बारा ज्योर्तिलिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे दर्शनासह नागफणी पॉईंट, गुप्त भीमाशंकर, हनुमान तळे, मुंबई पॉईंट, डिंभे धरण, कोंढवळ धबधबा, आहुपे यांसह भीमाशंकर अभयारण्यात फिरणे, तसेच परिसरामध्ये निसर्गाचा मनमुराद आनंद व देवदर्शन असा दुहेरी लाभ घेण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक येत असतात.
मात्र सद्यःस्थितीत केवळ आंबेगाव तालुकाच नव्हे तर येथे येणाऱ्या पर्यटकांच्या माध्यमातून करोनाचा संसर्ग जा भागात वेगात पसरण्याची शक्यता असल्यामुळे पर्यटनाच्या ठिकाणी पोलीस पाटील, होमगार्ड यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. श्रीक्षेत्र भीमाशंकर आणि पर्यटनस्थळी जाण्यास बंदी असून नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा घोडेगांव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांनी दिला आहे.
करोनाचा प्रसार थांबवण्यासाठी खबरदारी
करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने मागील तीन महिन्यांपासून सर्व सार्वजनिक व धार्मिक कार्यक्रम बंद आहेत. जिल्हाबंदी, संचारबंदी व जमावबंदी लागू करत नागरिक एकत्र जमणार नाहीत, याची खबरदारी घेतली जात आहे. परिसरामध्ये पावसाळ्यात दर शनिवार, रविवार आणि सरकारी सुटीच्या दिवशी सुमारे हजारोंच्या संख्येने भाविक व पर्यटक येथे येतात. इतर दिवशीही पर्यटकांची संख्या शेकडोंच्या घरात असते. यावर्षी देवदर्शन व पर्यटनासाठी गर्दी झाल्यास त्याचा विपरीत परिणाम येथील नागरिकांच्या आरोग्यावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारीचे उपाय म्हणून येथे पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे.