मुंबई (प्रतिनिधी) – जगभरात थैमान घालणाऱ्या करोना व्हायरसला अटकाव करण्यासाठी देश लॉकडाऊन केला आहे. लॉकडाऊनमुळे व्यवसाय, रोजगार, शेती, व्यापार यावर बंदचा परिणाम होणार असून भविष्यात आर्थिक संकट येणार आहे, अशी भीती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आपल्या सवयींमध्ये बदल करण्याची गरज असून येत्या काळात वैयक्तिक जीवनात आपल्याला काटकसरीने काम करा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
करोना साथीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी जनतेला करोनामुळे देशात उद्वणाऱ्या आर्थिक संकटाची जाणीव करून दिली. या संकटावर मात करण्यासाठी वैयक्तिक जीवनात काटकसरीने वागण्याचा सल्ला पवार यांनी दिला. करोनाचे संकट लगेच संपेल असे समजायचे कारण नाही. आजच्या स्थितीला तोंड देवू आणि उद्याच्या स्थितीलाही तोंड देण्यासाठी उत्तमोत्तम काम करू आणि या सगळ्यावर आपण मात करु. हा जो आपला निर्धार आहे त्यामध्ये तडजोड नाही, असा आत्मविश्वासही शरद पवार यांनी जनतेला दिला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पंतप्रधानांनी केलेल्या सूचना व मार्गदर्शन याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, असे सांगतानाच दिवसेंदिवस करोना विषाणूचे रुग्ण वाढत आहेत. या परिस्थितीत जमेची गोष्ट म्हणजे काही हॉस्पिटलमधून सेवा चांगली दिल्याने रुग्ण बरे होवून घरी गेले. मात्र, रुग्णांची वाढती संख्या ही चिंताजनक बाब आहे. तथापि पाश्चिमात्य देशात विशेषतः अमेरिका, स्पेन या देशांची सध्या भयावह उदाहरणे आहेत. त्या रस्त्याला आपल्याला जायचे नाही. आपल्याला मिळालेल्या सूचनांचे आपण पालन करूया, असे आवाहन त्यांनी केले.
सार्वजनिक क्षेत्रात काम करणारे लोक, स्वयंसेवी संस्था व इतर लोक संकटग्रस्त, मजुरांना अन्न धान्य व आधार देणाऱ्यांचेही त्यांनी कौतुक केले. या संकटाची व्याप्ती मोठी आहे. ही मदत अधिक काळ द्यावी लागणार आहे. वाड्या, वस्त्या, तांडे याकडे सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या लोकांनी लक्ष घालावे. भविष्यात आरोग्य शिबिरे घ्यायची आहेत त्याचे नियोजन आतापासूनच करा असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
डॉक्टरांनी सेवा देण्याचे थांबवू नये!
काही दवाखाने, हॉस्पिटल बंद केली आहेत. तर काही डॉक्टरांनी ओपीडी बंद केली आहे. ही गंभीर गोष्ट आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस डॉक्टर सेलचे माझे सहकारी दिवस-रात्र सेवा देत आहेत. अन्य डॉक्टरही काम करत आहेत. परंतु काही डॉक्टरांनी ओपीडी बंद केली हे योग्य नाही. त्यामुळे डॉक्टरांनी सेवा देण्याचे काम थांबवू नका. दवाखान्यांचे दरवाजे बंद करू नका, असे आवाहनही शरद पवार यांनी केले.