मुंबई : “कर्नाटकमध्ये सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुका मतपत्रिकेवर घेण्यात आल्या असल्याचे समजत आहे. निवडणुका कशा घ्याव्यात, हा निर्णय राज्य सरकारचा असतो. एकीकडे ईव्हीएमबाबत लोकांच्या मनात शंकाकुशंका निर्माण होत असताना प्रयोग म्हणून का होईना, महाराष्ट्रातील निवडणूका मतपत्रिकेवर घ्याव्यात, असा माझा आग्रह आहे, अशी मागणी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. तसेच याविषयीची माझी ही भूमिका मी आगामी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडणार आहे,” असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
अनेक राज्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ह्या ballot paper वर घेतल्या तो राज्याचा निर्णय असतो
महाराष्ट्रानी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका #BallotPaper वर घ्यावी @OfficeofUT @AjitPawarSpeaks @PawarSpeaks @NANA_PATOLE #NoEVM— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 13, 2022
राज्याच्या निवडणुका पाहता तो अधिकार राज्याचा असल्याने यावेळेस मतपत्रिकेवर मतदान घ्यावे, असेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. सध्या जनतेमध्ये ईव्हीएमबाबत संशयाचे वातावरण आहे. त्यामुळे एक प्रयोग म्हणून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मतपत्रिकांचा वापर करावा, अशी मागणी आव्हाड यांनी केली आहे. एवढेच नाही तर या संदर्भात मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीत आपण प्रस्ताव मांडणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
“अनेक राज्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घेतल्या आहेत. तो राज्यांचा निर्णय असतो. महाराष्ट्रानेही येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात”, असे ट्वीट गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. या संदर्भात पत्रकारांनी जितेंद्र आव्हाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही माहिती दिली.
२०१९ मध्ये निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी काही राजकीय पक्षांकडून करण्यात येत होती. त्यावेळी निवडणुक आयोगाने यापुढे मतदानासाठी बॅलेट पेपरचा वापर होणार नाही असे सांगितले होते. त्यावेळचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत आता ईव्हीएमवरच निवडणूक घेण्यात येईल असं स्पष्ट केले होते. यावेळी ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड होऊ शकतो, मात्र त्या मशीनसोबत छेडछाड होणं शक्य नाही असेही सुनील अरोरा यांनी म्हटले होते.