टाकळी हाजी – सध्या सर्वत्रच महावितरण प्रशासनाने वीजबिल न भरणाऱ्या शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेतल्याचे गावागावांत दिसून येत आहे. सध्या वाढते ऊन आणि वाळून चाललेली पिके त्यातच महावितरणचा तगादा यामुळे शिरूर तालुक्यातील शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे.
सध्या सर्वत्र पाण्याची सुविधा चांगली असल्याने पिके जोमात आली आहेत. परंतु शेतकऱ्याची अडचण वाढली असून वीजपुरवठा महावितरण कंपनीने बंद करण्याच्या धोरणाने पुन्हा अडचणीत सापडला आहे. सध्या जोमात असलेली पिके धोक्यात आली आहेत. वीजबिले भरली नसल्याने वीजपुरवठा खंडित करण्याचा सपाटा महावितरण प्रशासनाने सुरू केला आहे. त्यामुळे इकडे आड तिकडे विहीर अशा परिस्थितीत शेतकरी सापडला आहे.
शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी वर्षानुवर्षे वाढतच आहेत. त्यात करोना, हवामान बदल, तसेच पिकांना योग्य बाजारभाव नसल्यामुळे शेतकऱ्याच्या हातात पैसा आला नाही. त्यामुळे हातातोंडाशी आलेले पिक वाया जाईल. तसेच शेतकरी अजून रसातळाला जाण्याची शक्यता निर्माण होईल म्हणून सरकारने वीजबील माफी करावी, अशी मागणी शेतकरीवर्गातून केली जात आहे.
शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारने विजेबाबत योग्य निर्णय घेवून काही योजना देवून शेतकऱ्यांना सध्याच्या परिस्थितीत मदत करणे गरजचे आहे. सध्या पिके चांगली आहेत. ज्यावेळेस उत्पन्न चांगले येईल व शेतकऱ्यांच्या हातात पैसा येईल. त्यावेळेस शेतकरी निश्चित वीजबिले भरायला सुरुवात करतील, अशी भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.
अगोदरच शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. शासनाने शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय देवून यावेळेस कर्ज माफ करावे. नाहीतर शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल. यामुळे महावितरण प्रशासनाने शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करू नये.
– माऊली ढोमे, शेतकरी संघटना अध्यक्ष
शेतकऱ्यांची वीजबिले थकीत आहेत. 2020 – 21 या कालावधीतील वीजबिले भरणे आवश्यक आहे.त्यासाठी महावितरणने दंड, व्याज माफ करण्याची योजना दिली आहे. बिल भरण्यात देखील अनेक सवलती देण्यात येत आहेत. बिलातील 33 टक्के रक्कम त्याच क्षेत्रात खर्च करण्यासाठी ठेवली जाते. रोहित्र व इतर साहित्य शेतकऱ्यांसाठी मोफत देण्यात येते. त्यासाठी शेतकऱ्यांना खर्च येणार नाही. त्यामुळे वीजबिल भरून महावितरण कंपनीला सहकार्य करावे.
– सोमनाथ माने, उपकार्यकारी अभियंता शिरूर