मुंबई: विधानसभा निवडणुकीसाठी मनसेची पुण्यातील पहिली प्रचारसभा बुधवारी अचानक पडलेल्या वादळी पावसामुळे ऐनवेळी रद्द करावी लागली. यावेळी मनसे कार्यकर्त्यांचा उत्साहही शिगेला पोहोचला होता. मात्र, सभा रद्द झाल्याचे दिसताच मनसे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली.
दरम्यान आज राज ठाकरे मराठा कॉलनी, पटेल नगर सांताक्रूझ पू.मुंबई येथून प्रचाराचा नारळ फोडणार आहेत.
राज ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे
- कालची पुण्याची सभा वादळी पाऊसामुळे रद्द करावी लागली. त्यात काल पीएमटी बस चालक बसवर झाड पडून मृत्युमुखी पडला.
- शहरांचं नियोजन कोसळलंय, निवडणुका आल्या की जाहीरनामे बाहेर येतात, वाट्टेल ती आश्वासन दिली जातात. पुन्हा परिस्थिती जैसे थे. आणि विरोधी पक्षाचे नेतेच सत्ताधारी पक्षात जाऊन बसतात आणि सत्ताधारी आमदार गप्प बसता
- ठाण्यात एक मुलगी स्वतःच्या लग्नाची खरेदी करायला निघाली आणि खड्ड्यात पडून ती अपघातात मृत्युमुखी पडली. शहरांचा पार विचका झालाय. अर्ध्या तासाच्या पावसाने पुण्याची जरी अशी अवस्था होत असेल तर काय बोलायचं?
- पीएमसी बँक बुडाली, लोकांचे हक्काचे पैसे त्यांना काढता येत नाहीयेत. बरं ह्या बँकेवर अधिकारी पदावरची माणसं कोण तर भाजपची. शेतकरी, कामगार देशोधडीला लागलेत, तरुण बेरोजगार झालेत आणि सरकार कसंही वागतात, न्यायालयांकडून निर्णय मिळत नाहीत. मग जनतेचा राग कोण व्यक्त करणार?
- आज शहरं खड्ड्यात आहेत, लोकं खड्ड्यात पडून मरत आहेत. बेरोजगारी टोकाला आहे, उद्योग बंद पडत आहेत. काय झालंय लोकांना त्यांच्या जाणिवांना? जाणिवा नसलेली लोकं म्हणजे जिवंत प्रेतं? आपण सत्ताधाऱ्यांना कधी प्रश्न विचारणार आहोत?
- मी या विधानसभेला तुमच्याकडे एक मागणं घेऊन आलोय; ते मागणं म्हणजे, ह्या राज्याला गरज आहे सक्षम, प्रबळ, कोणासमोर न घरंगळत जाणारा विरोधी हवाय. सत्तेतला आमदार सरकारला प्रश्न विचारू शकत नाही पण विरोधी पक्षातला आमदार सरकारला नामोहरम करू शकतो,मी आज प्रबळ विरोधी पक्ष म्हणून समोर येतोय
- आज गरज आहे सरकारला प्रश्न विचारणाऱ्यांची आणि जर विधानसभेत प्रबळ विरोधी नसेल तर सरकार तुमच्यावर बुलडोझर फिरवेल आणि म्हणून मी सत्तेसाठी नाही तर विरोधी पक्ष प्रबळ करावा हे मागणं घेऊन आलोय
- जेंव्हा जेंव्हा आपल्या सणांवर बंदी आणायचा प्रयत्न केला तेंव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभी राहिली आणि सण साजरे केले