मुंबई: विधानसभा निवडणुकांचे वारे जोरात वाहू लागले आहेत. राजकारणी नेते प्रचार सभेत अक्षरशः आश्वासनांचा पाऊस पाडत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोजगारात मागे असलेला महाराष्ट्र गेल्या पाच वर्षात आम्ही १ नंबरवर आणला असे विधान केले आहे.
ते माळशिरस विधानसभा मतदार संघाचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारसभेत नातेपुते याठिकाणी बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले, “रोजगारात मागे असलेला महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आणण्याचे काम आमच्या सरकारनं केलं आहे. तसेच पाच वर्षांपूर्वी शिक्षणात महाराष्ट्र १८व्या क्रमांकावर होता तो आता तिसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्राच सकल उत्पन्न आधी १६ लाख कोटी रुपये होतं आज ते २६ लाख कोटी झालं आहे. आमच्या सरकारने राज्याच्या तिजोरीत १० लाख कोटी रुपयांची भर टाकली आहे”
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली. आघाडीसरकारने देशाची दीशाभूल केली. पंधरा वर्षांतील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कामाच्या तुलनेत गेल्या पाच वर्षांत आम्ही त्यांच्यापेक्षा दुप्पट कामं केले असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.