आम आदमी पक्षातर्फे 28 कलमी गॅरंटी कार्ड
नवी दिल्ली – आम आदमी पक्षाने दिल्ली निवडणुकीसाठी 28 कलमी गॅरंटी कार्डाच्या स्वरूपात आपला निवडणूक जाहीरनामा प्रकाशित केला आहे. उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी आज हा जाहींरनामा प्रकाशित केला. मुंबईत ज्या प्रमाणे नाईट लाईफ ही संकल्पना राबवून दुकाने व हॉटेल्स चोविस तास सुरू करण्यात अनुमती देण्यात आली आहे त्याप्रमाणे दिल्लीतही चोविस तास व्यवहार सुरू करण्यास अनुमती देण्यात येईल हे एक प्रमुख आश्वासन त्यात देण्यात आले आहे.
सरकारी शाळांच्या अभ्यासक्रमात हॅपीनेस आणि उद्योगशीलतेचा समावेश केल्यानंतर आता अभ्यासक्रमात देशभक्तीही शिकवली जाणार आहे असे त्यांनी जाहीर केले आहे. दिल्लीत साफसफाई करताना एखाद्या कर्मचाऱ्याचे निधन झाल्यास त्या सफाई कामगाराच्या कुटुंबाला एक कोटी रूपयांची नुकसानभरपाई दिली जाणार आहे. दिल्ली सरकारने सन 2015 साली जनलोकपाल विधेयक संमत केले आहे. हे विधेयक त्यांनी केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवले आहे. पण मोदी सरकारने गेली चार वर्षे त्यावर कोणताच निर्णय दिलेला नाही. हे विधेयक केंद्र सरकारने त्वरीत मंजुर करावे यासाठी केंद्रावर पुन्हा दबाव आणून त्यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाहीही यात देण्यात आली आहे.
दिल्लीत जगातील सर्वात मोठे मेट्रो नेटवर्क उभारण्याची हमीही यात देण्यात आली आहे. दिल्लीतील दहा लाख ज्येष्ठांना मोफत तीर्थ यात्रा घडवण्याचे आश्वासनही आम आदमी पक्षाने दिले आहे. घरपोच रेशन ही व्यवस्था पुर्ण कार्यक्षमतेने राबवण्याची हमीही या पक्षाने दिली आहे. पाच वर्षाच्या कालावधीत दिल्लीत आम्ही बऱ्याच सुधारणा केल्या आहेत आता त्यापुढील सुधारणा करण्यासाठी जनतेने आम्हाला साथ द्यावी असे आवाहनही आम आदमी पक्षाच्यावतीने करण्यात आले आहे.