नवी दिल्ली – महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटीशांविरूद्ध लढला गेलेला स्वातंत्र्य लढा हे एक नाटक होते असे वादग्रस्त विधान करणारे भाजपचे माजी केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी आपले विधान मागे घेण्यास नकार दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की मी जे काही म्हणालो आहे त्यावर मी ठाम आहे. मी या वक्तव्यात महात्मा गांधी, किंवा नेहरू यांचे एकदाहीं नाव घेतलेले नाही. कोणत्याही राजकीय पक्षाचेहीं मी नाव घेतलेले नाही. माझ्या कालच्या वक्तव्यात त्यांचे नाव दाखवा असे आव्हान त्यांनी विरोधकांनाच दिले आहे.
माझ्या वक्तव्या बाबत माध्यमांमध्ये जे काही सांगितले जात आहे ते पुर्ण खोटे आहे असेही त्यांनी म्हटले आहे. काल त्यांच्या नावाने हे विधान प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. भाजपच्या नेतृत्वानेही त्यांच्या विधानाशी फारकत घेऊन त्यांना अशा प्रकारची विधाने न करण्याची समज दिली होतीे. त्यांच्या विधानाचे पडसाद आज संसदेच्या कामकाजातही उमटले आणि विरोधकांनी त्यांच्या विरोधात आज संसदेत जोरदार गदारोळही केला.
काल हेगडे म्हणाले की या तथाकथीत स्वातंत्र्य सैनिकांपैकी कोणावरही ब्रिटीश सरकारने एकदाहीं लाठी हल्ला केला नाहीं.त्यांचा हा स्वातंत्र्य लढा हे एक नाटकच होते. ब्रिटीशांच्या संमतीने आणि संगनमतानेच ते नाटक चालू होते, हा खरा लढाच नव्हता. ती एक ऍडजस्टमेंट होती असे त्यांनी म्हटले होते. हेगडे हे कर्नाटकातून सहा वेळा लोकसभेवर निवडून आलेले नेते आहेत. ब्रिटीशांनी कोणाच्या सत्याग्रहाला घाबरून देश सोडला नाहीं तर त्यांना नैराश्य आल्याने त्यांनी देश सोडला व देशाला स्वातंत्र्य मिळाले अशी टिप्पणीही त्यांनी काल केली होती.
आज लोकसभेत त्यांचा उल्लेख कॉंग्रेस नेते अधिररंजन चौधरी यांनी रावण की औलाद असा केला. हेगडे यांचा निषेध करीत कॉंग्रेस सदस्यांनी लोकसभेत सभात्यागही केला.