मोरगिरी -घाणबी, ता. पाटण येथील भिमाबाई गणपत जाधव यांच्या घरावर शनिवार दि. 10 रोजी सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास घराच्या आड्यावर विजेचा लोळ पडल्याने घरासह घरातील प्रापंचीक साहित्यचे सुमारे अडीच लाखांचे नुकसान झाले असल्याची माहीती तलाठी एस. जे. जागंडे यांनी दिली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, पाटण तालुक्यात गेले दोन दिवसांपासून परतीच्या पावसाने ठिकठकाणी हजरी लावली आहे. यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शनिवार दि. 10 रोजी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास ढगांचे गडगडाट व विजेसह पावसाने सुरूवात केली. यावेळी मोठा आवाज होऊन घाणबी येथील भिमाबाई गणपत जाधव यांच्या घरावर विजेचा लोळ पडला.
त्यांच्या घराला मोठ्या प्रमाणात आग लागली. या आगीची तीव्रता ऐवढी होती की, घराच्या भिंती पडल्या. लाकडी साहित्याने पेट घेल्याने घरातील संसार उपयोगी सर्व साहित्य जळून खाक झाले.
त्याच बरोबर घरातील भात, ज्वारी, गहु यासह अन्नधान्य साठा आगीत जळाला. घराचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. या घटनेने जाधव कुटुंब उघड्यावर आले आहे. पावसाची चाहुल लागताच भिमाबाई जाधव यांच्या घरातील सर्वजण शेजारी जाऊन बसल्याने सुदैवाने बचावले. दरम्यान, उपसरपंच चंद्रकांत सपकाळ, माजी उपसरपंच तुकाराम चव्हाण, जगन्नाथ जाधव, नारायण सपकाळ, नारायण जाधव यांनी या कुटुंबास तातडीची मदत केली. तलाटी एस. जे. जागंडे, ग्रामसेवक के. एम. खरात यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.