नागरीवस्तीमधील नागरिकांच्या जीवावर बेतणार
नीरा- नरसिंहपूर (वार्ताहर) – पिंपरी बुद्रुक (ता. इंदापूर) येथील स्मशानभूमीलगत टणू येथील सबस्टेशनकडे जाणारी बावडा ते टणु 33/11 मेन लाईन आहे. दोन खांबामध्ये तारा लोंबकळत आहेत. तसेच एकमेकांना तारा चिकटण्याच्या अवस्थेत आहेत. याचा धोका जीवावर बेतण्याची दाट शक्यता आहे. स्मशानभूमीलगत काही कुटुंब व वस्ती असल्याने त्या ठिकाणी लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. महावितरण कंपनीने या तारा हटवाव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
महावितरणने तारांचा तान न काढल्याने त्या ठिकाणावरील तारा खाली आहेत. वाऱ्यापासून बचाव करण्यासाठी येणाऱ्या पुढील अडचणीसाठी ताबडतोब तारांचा ताण काढून घेणे गरजेचे आहे. बावड्यावरून येणारी तीच लाइन पिंपरी बुद्रुकमधील स्मशानभूमीच्या बाजूस आहे. तेथील तारा लोंबकळत आहेत. वाऱ्यापासून तारा एकमेकांना लागू नये यासाठी महावितरण कंपनीने काम दिलेल्या ठेकेदाराकडून दुरुस्त करून घेणे गरजेचे आहे. परंतू महावितरण कंपनीने जबाबदारी झटकली आहे काय, असा सवाल नागरिकांतून उमटत आहे.