ग्रामपंचायतीचा वीजबिलांचा खर्च वाचणार; खासदारांनी जिल्हा परिषदेत दिवसभर घेतला वर्ग
नगर – ज्या ठिकाणी पाण्याची उणीव आहेत ते अधिक बळकट करून सौर ऊर्जा प्रकल्प या योजनेसाठी आगामी काळामध्ये सौर ऊर्जेच्या माध्यमातून सर्व गावांना मोफत पाणी कशा पद्धतीने मिळेल याकरिता संबंधित ग्रामपंचायतीने तात्काळ जागा उपलब्ध करून द्याव्यात असे प्रतिपादन खासदार सुजय विखे यांनी केले आहे. दरम्यान जिल्हा परिषद शाळेच्या ज्या मोक्याच्या जागा आहेत त्या विकसित करून त्यांचा दर्जा सुधारता येईल का यासंदर्भात प्रशासनाने प्रयत्न करावेत अशा सुचनाही खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिल्या.
जिल्हा परिषदमध्ये आज दि.14 अधिकारी तसेच पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती .या बैठकीला पंचायत समितीचे सभापती रामदास भोर, सुजित झावरे सदस्य, अनिल कराळे, बाळासाहेब हराळ, अर्जुन शिरसाठ, विश्वनाथ कोरडे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, आदींसह शिक्षण, कृषी, बांधकाम विभागातील प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते.
खासदार विखे म्हणाले की, ज्या ठिकाणी भूसंपादन रस्त्यांची कामे सुरू आहे त्या लाभार्थ्यांच्या बरोबर बैठक घेऊन हा विषय मार्गी लावेल, त्याचप्रमाणे शाळांसाठी जिल्ह्यामध्ये 100 कोटींची आवश्यकता आहे एक वर्षात हा निधी उपलब्ध होऊ शकतो त्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करणे आवश्यक आहे.
आगामी काळामध्ये स्थानिक पातळीवर येणाऱ्या प्रश्नांची सोडवणूक करण्याकरिता एकत्रपणे काम होणे गरजेचे आहे. त्याकरिता केंद्र सरकार असो अथवा राज्य सरकार किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेतील अधिकारी असून त्यांचा समन्वय राखला गेला पाहिजे. त्या अनुषंगाने आता सर्व अधिकाऱ्यांचा समन्वय ठेवून संबंधित गावांमध्ये यांची एकत्र बैठक कशा पद्धतीने होईल याचे नियोजन आगामी काळामध्ये निश्चितपणे केले जाईल असे खासदार डॉ. विखे यांनी म्हटले आहे.
राज्यामध्ये ट्रान्सफॉर्मर संदर्भामध्ये कोणतीही अडचण नाही मात्र लागणारे ओईल हे उपलब्ध नसल्यामुळे त्याचा पुरवठाची अडचण सर्वत्र जाणवत आहे आगामी काळामध्ये ट्रांसफार्मर ज्या ज्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याकरिता संबंधित विभागांशी बोलले जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
नगर एम.आय. डि.सी लगत असणाऱ्या के.के.आर यांच्या जमिनीचा विषय हा महत्त्वाचा आहे याठिकाणी आरक्षण पडल्यामुळे आणि त्यांना घरकुल बांधणे, तसेच स्वतःचे घर बांधणे सुद्धा अवघड झाले आहे यातून मार्ग काढण्यासाठी लवकरच संरक्षण मंत्रालयाशी या संदर्भात पाठपुरावा करून यातून काही मार्ग काढता येईल का हेसुद्धा केले जाईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेल्या शाळा अथवा कसम बिल्डिंग पाहता अनेक ठिकाणी त्याची दुरवस्था झाल्याचे दिसून येत आहे याअगोदर सुद्धा अनेकांनी तक्रारीही केल्या होत्या पण त्याची म्हणावी तशी दखल घेतली जात नाही मग प्रशासन एखादी दुर्घटना घडण्याची वाट पाहते का असा सवालही खासदार विखे यांनी उपस्थित करून तात्काळ या संदर्भातल्या उपाय योजना प्रशासनाने कराव्यात असे आदेशही त्यांनी यावेळी दिले.
खारे कर्जुने येथील पाझर तलावाचे काम निकृष्ट दर्जाचे आहे अशी तक्रार करण्यात आली होती या संदर्भामध्ये संबंधित अधिकाऱ्यांनी दखल घेतली का अशी विचारणा त्यांनी केली यासंदर्भातला अहवाल तात्काळ सादर करा असे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. दुष्काळाच्या पाठोपाठ अतिवृष्टी बंद झालेले आहे शेतकऱ्यांनी मदत मिळावी याकरिता सातत्याने वेळप्रसंगी मागणी केली अथवा आंदोलने केली त्याची म्हणावी तशी दखल घेतली गेली नाही ही वस्तुस्थिती आहे दुष्काळाच्या काळामध्ये ज्या शेतकऱ्यांचे अनुदान देणे बाकी आहे त्यासंदर्भात तात्काळ महसूल विभागाची बोलून शेतकऱ्यांना मदत मिळून देणार असल्याचेही खासदार विखे यांनी सांगितले.
ते परत सरपंच होणार
पंडित दीनदयाळ योजनेच्या घरकुल योजना करता सरपंच कैलास लांडे या युवकाने जे प्रयत्न केले ते अत्यंत कौतुकास्पद असून सुमारे आठ ते नऊ घरकुल योजना त्यांनी या माध्यमातून मंजूर करून घेतल्या असे म्हणताच सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट करून त्याचे कौतुक केले.त्यांना परत सरपंच होण्यापासून कुणी रोखू शकत नाही अशी मिश्किली पण विखे यांनी केली.
काटमोरे कुठे पळतायं?
बैठक सुरु असताना प्राथमिकचे शिक्षणाधिकारी रमाकांत काटमोरे शिक्षण विभागाची बैठक असल्याने त्या बैठकीस जाण्याची परवानगी मागू लागताच सुजय विखे म्हणाले,काटमोरे कुठे पळताय आता राष्ट्रपती राजवट आहे व मी केंद्राचा प्रतिनिधी आहे.माझ आता ऐकाव लागेल त्यावर खसखस पिकली.
बायकोकडे जो नंबर तोच तुम्हाला दिला आहे
मी व्हाट्सअप वापरत नाही. माझ्या बायकोकडे माझा जो नंबर आहे तोच नंबर तुम्हाला दिला आहे. आपण आपले असणारे प्रश्न आम्हाला टेक्स्ट मेसेज टाकून आपले नाव नंबर पाठवून कळवल्यास त्याची निश्चितपणे सोडवणूक केली जाईल. कारण अनेक वेळेला अधिवेशन,बैठका यामुळे फोन घेणे शक्य नसते.त्यामुळे नागरिकांनी त्याचा गैरसमज न करता मेसेज टाकून सहकार्य करावे असे आवाहन खासदार विखे यांनी केले.
पाटील हे काम तुमच्याच काळात हवं होतं
पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर हे नगर-कल्याण महामार्गावरील मोठ्या बाजारपेठेचे गाव आहे.या गावाच्या बसस्थानकापासून वासुंदे बायपास चौकाची अत्यंत दुरावस्था झालेली आहे.हा रस्ता मार्गी लावला अशी मागणी सावली प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.भाऊसाहेब खिलारी यांनी उपस्थित केला.
त्यावर विखे यांनी सुजीत झावरे यांच्याकडे बघत हा प्रश्न तुम्ही इतक्या वर्षे सत्तेत होता त्यावेळेसच मार्गी लागयाला हवा होता पण आता मी पूर्ण करतो असे म्हणताच सुजीत झावरे म्हणाले,दादा तुम्ही मला जास्त काळ सत्तेत राहूच दिले नाही यावर सभागृहात हशा पिकला.