एकदा माझा पाय चुकून लाल मुंग्यावर पडलेला. तेव्हा मुंग्यांनी माझा पाय अक्षरश: फोडून काढलेला. मुंग्यांच्या चावण्याने माझा पाय जितका लाल झालेला अगदी तितकाच लाल माझा मेंदू आणि मन झालेलं. आणि म्हणून मी चिडून त्या शेकडो लाल मुंग्यांना जाळून टाकलेलं. माझ्या डोळ्यांना दिसलेली एकही मुंगी मी जिवंत ठेवली नव्हती. त्यावेळी माझ्या पायाची आग शांत नव्हतीच झाली पण हो, माझा मन-मेंदूची आग मात्र नक्कीच विझून गेलेली. कुठेतरी बदला घेतल्याची भावना मला सुखावून गेली होती.
पण नंतर, दुसऱ्या दिवशी माझं अगदी सहजच त्या जळलेल्या मुंग्यांकडे लक्ष गेलं. तेव्हा त्या मरून पडलेल्या मुंग्याकडे पाहून मला अजिबात आनंद नाही झाला. उलट मी कित्ती मोठी चूक केली आहे , याची जाणीव मला प्रकर्षाने झाली. मला जाणवलं की त्या मुंग्यांच्या चावण्याने मी काही मेले नाही किंवा मी काही आजारीही पडले नाही. त्यांच्या इजेने माझं खरंतर काहीच नुकसान झालं नव्हतं. पण मी जी इजा त्यांना केली होती त्याने त्यांचे आयुष्यच संपलं होतं. मला अचानकच आतून खुप मोठं पाप केल्याची भावना छळायला लागली. मी खुप अस्वस्थ झालेले. माझ्यातली संवेदना त्यांना जाळताना कुठे गेलेली ? हा प्रश्न त्रास द्यायला लागला.
आपण खुनी आहोत असं वाटायला लागलं. खरंतर एखाद्या सामान्य व्यक्तीसाठी खुप शुल्लक गोष्ट असेल. कोणतीही सामान्य व्यक्ती माझ्यावर हसेलही आणि मी किती जास्त फालतू विचार करते असंही म्हणेन. मुंग्याच तर आहेत त्या, त्यांचा काय एवढा विचार करायचाय ? असंही म्हणेन. पण माझ्या सारख्या संवेदनशील व्यक्तीसाठी ही खुप मोठी गोष्ट होती. आयुष्य ही काही चिल्लर गोष्ट नसते, याची जाणीव, किंमत आणि विश्वास या तिन्ही गोष्टी मला त्या घटनेतून कळल्या. त्यानंतर मी एकाही मुंगीला मारलं नाही. अगदी मला चावणाऱ्या, माझ्या अंगावरल्या मुंगीलाही मी हलकेच उचलून खाली सोडून देते. तेव्हापासून मला मुंग्यांच्या चावण्याचा रागच येत नाही. कारण चावणं हा तिचा स्वभाव आहे. आणि स्वत:च्या जीवाला जगवण्यासाठीचं तिचं ते शस्र आहे.
मी तेव्हा 8वी /9वी ला होते. तेव्हा मला आयुष्याचं मुल्य कळलं. आणि म्हणूनच आज जगात जे चाललंय ते पाहून मन फार अस्वस्थ होतंय. खुप भिती वाटतीये. कोरोना व्हायरसमुळे मरणाऱ्या लोकांचे दिवसेंदिवस वाढणारे आकडे पाहून काळजात भूकंप, त्सुनामी, वावटळ आल्यासारखं वाटतंय. अनेकदा लोकांकडून ऐकू येतं कि जाऊदे आपला जीव वाचला हे महत्वाचं. आपण सकारत्मकच विचार करून राहायचं. जे मेले त्यात त्यांची चुक होती की त्यांनी काळजी घेतली नाही. किंवा जे मरतायेत ते सगळे म्हातारेच तर आहेत. त्यांचा असाही काय उपयोग आहे.
खरंतर त्यात काहीच चुकीचं नाही. इतका प्रँक्टीकल विचार तर चालतोच. पण तरी माझ्यासारख्या भावनिक वेड्या लोकांना इतकं प्रँक्टीकल असणं झेपतच नाही. जिथे किड्या मुंग्यांच्या मरण्याने आम्हाला त्रास होतो. तिथे एवढ्या लोकांच्या मरणाने त्रास न होणं कसं शक्य आहे ? एकदा माझ्या वडीलांचं मेंदूचं आँपरेशन झालेलं. तेव्हा आँपरेशन थेटर मधून बाहेर पडणाऱ्या माझ्या बेशुद्ध वडिलांना पाहून माझ्या अंगातली सगळी शक्ती अचानक जाऊन, मी खाली कोसळताना स्वत:ला कसंबसं सावरलं होतं. तेव्हा आयुष्यात पहिल्यांदाच थोड्याफार प्रमाणात का होईना पण आपल्या जवळच्या इतक्या प्रिय व्यक्तीला गमवण्याची भिती दाटूून आली होती.
म्हणून वाटतं अगदी तसंच, आज कोरोनामुळे हाँस्पिटलमधे मरणाच्या दारात असलेल्यांच्या घरच्यांनाही वाटत असेल. आपलं माणूस आपल्याला सोडून जाईल की काय या भितीने त्यांना जेवण ही जात नसेल. आपल्यासारख्या, अजून जवळचं कोणीही कोरोनामुळे न गेलेल्या बऱ्याच जणांना वाटतं की मरणाऱ्यांच्यात म्हातारीच लोकं जास्त आहेत. त्यांचे दिवस तर असेही भरलेत त्यामुळे फार काही गमवलं नाही. पण उदाहरणार्थ जर एखादे कोरोना झालेले आजोबा हाँस्पिटलमधे सिरिअस अवस्थेत असतील तर ते त्यांच्या घरी असलेल्या किंवा त्याच हाँस्पिटलमधे कोरोनामुळे अँडमिट असलेल्या त्यांच्या प्रिय बायकोला मनातल्या मनात म्हणत असतील की , ‘भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते…..’ त्याचं मरणारं काळीज ग्रेस होऊन गात असेन.
खरंच, या जगात आपल्या जाण्याने कुणाला फरक पडो किंवा न पडो पण आपल्या पार्टनरला खुप फरक पडतो. खरंतर आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात एखादी अशी व्यक्ती असतेच जिचं आपल्यावर इतकं प्रेम असतं कि आपल्या जाण्याने तिच्या आयुष्यावर कायमचा फरक पडतो. आणि ती व्यक्ती अनेकदा आपली पार्टनरच असते. आता तुम्ही म्हणाल की, कुणामुळे कुणाचं आयुष्य थांबतं का ? तर त्याचं उत्तर आहे की, नाहीच थांबत. आयुष्य त्याच्या वेगाने पुढे जात राहतं. या जगासोबत त्याला पुढे जावंही लागतं. पण मन ? मनाचं काय ? आपल्या पार्टनरच किंवा आपल्यावर जिवापाड प्रेम करणाऱ्या व्यक्तीचं मग ती व्यक्ती आई, वडील किंवा आपली मुलं असतील. त्याचं मन तिथंच राहतं जिथं आपण त्याला सोडून जातो. हो, काही मनं काळासोबत जातातही पुढे. पण काही मनं नाहीच जात ना !
त्यामुळेच आज मला खुप भिती वाटतेय. वाटतं की या कोरोनात माझ्या जवळचं किंवा ओळखीचं कोणी गेलं तर ? म्हणून वाटतं कि जगातभरात अगदी दुसऱ्या देशातल्या, माझा काडीचाही संबंध नसलेल्या व्यक्तीच्या जाण्याने मला फरक पडतो. कारण ते माझे कोणीही नसले तरी ते कोणाचे तरी खास असतात. त्यांच्या जाण्याने कोणाच्या तरी आयुष्यात कधीही न भरणारा एक खुप मोठा खड्डा पडणार असतो.
आता मरणाऱ्यांची गोष्टं. मरणाऱ्यांमधे कुणीतरी असं असेन ज्याला आपल्या मुलीचं लग्नं करायचं असेल. कुणी तरी असं असेन ज्याला मुलांच्या मुलांना बघायचं असेल. कुणीतरी असं असेन ज्याच्या जीवावर त्याचं अख्खं कुटूंब अवलंबून असेन. कुणीतरी असेन ज्याची स्वत:च्या घराबद्दल, करिअर बद्दल, नात्यांबद्दल खुप स्वप्नं असतील. कुणीतरी असंही असेन ज्याने कधीतरी कुणाला खुप दुखावलं असेन आणि त्याला शेवटचं साँरी म्हणायचं असेल. कुणीतरी असंही असेन ज्याला कुणाला तरी शेवटचं i love you म्हणायचं असेल. पण मरणाने हे सगळं संपवण्याची वेळ आणलीये त्यांच्यावर.
खरंतर, जगात आज पर्यंत खुप लोक मरत आलेत, या पुढेही मरतील, प्रत्येक व्यक्ती हा कधीतरी मरतोच. जन्माची जोडी ही मरणाशीच बांधलेली असते. पण म्हणून रोज ढिगाने मरणाऱ्या इतक्या लोकांना बघणं किंवा ऐकणं सोप होत नाही. मनामधलं हे भय आजकाल संपता संपत नाही. त्यामुळे सगळ्यांनी स्वत:ची काळजी घ्या. स्वत:साठी नाही तर ज्यांचं आपल्यावर जिवापाड प्रेम आहे त्यांच्यासाठी. आपल्या प्रिय व्यक्तींसाठी तुम्हाला जगायचंय. तुम्ही पाहिलेली स्वप्नं तुम्हाला जगायची आहेत. आपल्या म्रुत्यूचे ढिग बघायचे नाहीत. आपल्याला जगण्यासाठी कोरोनाशी लढायचंय. कारण आयुष्य ही काय चिल्लर गोष्ट नसते.
– प्रियंका जगताप.