रत्नागिरीसह सिंधुदुर्गमधील अनेक रस्ते बंद
रत्नागिरी/सिंधुदुर्ग – रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी पुराचे पाणी अद्याप ओसरलेले नाही. त्यामुळे जनजीवन अजूनही विस्कळीत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर तालुक्यात अद्यापही पाऊस कायम आहे. परिणामी जिल्ह्यात दूध आणि भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. तर सिंधुदुर्गातील अनेक रस्ते बंद असून काही गावांशी संपर्क तुटला आहे.
मुंबई-गोवा सागरी महामार्ग बंद
मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे केळुस गावात पाणी आहे. त्यामुळे मुंबई-गोवा सागरी महामार्गावरील वाहतूक चौथ्या दिवशीही बंद आहे. तर भनसाळ नदीच्या पुराचे पाणी ओसरल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली आहे. कुडाळमधील कर्ली नदीची पूरस्थिती कायम आहे. तर तिलारी धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु असल्याने बांदा, दोडामार्ग रस्ता बंद करण्यात आला आहे. तसेच मनेरी गावात पूलावरुन पाणी जात असल्याने तो रस्ताही बंद केला आहे.
सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे आंबाघाटातील रस्ता मधोमध खचला असून दोन दिवस वाहतूक बंद होती. जिल्ह्यात होणारा दुधाचा आणि भाज्यांचा तुटवडा पाहून आज घाटातून एकेरी वाहतूक सुरु करण्यात आली आहे. तसेच मुंबई-गोवा महामार्गावरील खेड आणि चिपळूण याठिकाणच्या जगबुडी आणि वाशिष्टी या नद्यांच्या पाण्याची पातळी कमी झाली असून तेथील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. तर महामार्गावरील संगमेश्वर बावनदी आणि आरवली येथील गडनदी या नद्यांचे पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे.
चिपळूण, खेड या ठिकाणी पावसाचा जोर कमी झाला तरी राजापूर, लांजा याठिकाणी पावसाचा जोर कायम आहे. राजापूरच्या काही सखल भागात अजूनही पुराचे पाणी असल्याने तिथले जनजीवन विस्कळीत झाले आहे.
राजापूरमधील कोंडवशी गावातील काकये धरण पूर्ण क्षमतेने भरले असून ओव्हरफ्लो झाले आहे. या धरणाला मोठ्या भेगा पडल्या असून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग होत आहे. त्यामुळे धरणालगतच्या गावांना धोका निर्माण झाला आहे. परिणामी ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.