तरौबा, वेस्ट इंडिज – कृष्णप्पा गौतमने घेतलेल्या सहा विकेट्सच्या जोरावर भारत “अ’ संघाने वेस्ट इंडिज “अ’ संघाचा पहिला डाव 194 धावांमध्ये गुंडाळला व पहिल्या डावात 7 धावांची आघाडी मिळविली. तथापि, दुसऱ्या दिवसअखेर भारताचा दुसरा डाव 3 बाद 23 असा अडचणीत सापडला.
दोन्ही संघांच्या गोलंदाजांनी या सामन्यात पहिले दोन दिवस वर्चस्व गाजविले आहे. भारताने पहिल्या डावात केलेल्या 201 धावांना उत्तर देण्यासाठी विंडीजने 1 बाद 23 धावसंख्येवर पहिला डाव पुढे सुरू केला. जेरेमी सोलोझानो व सुनील ऍम्ब्रीस यांनी चौथ्या विकेटसाठी केलेली 68 धावांची भागीदारी हेच त्यांच्या डावाचे वैशिष्ट्य ठरले. ऍम्ब्रीसने 5 चौकारांसह 43 धावा केल्या. जेर्मीन ब्लॅकवुडने चमकदार खेळ करीत 22 धावा केल्या व सोलोझानोला साथ देण्याचा प्रयत्न केला. ही जोडी फुटल्यानंतर त्यांच्या डावाची घसरगुंडी उडाली. एका बाजूने झुंजार खेळ करीत सोलोझानोने नाबाद 69 धावा टोलविल्या. 286 मिनिटांच्या खेळांत त्याने 7 चौकार मारले. भारताचा ऑफस्पीनर गौतमने 67 धावांमध्ये 6 गडी बाद केले. उमेश यादवने 29 धावांमध्ये 2 बळी घेत त्याला यथार्थ साथ दिली.
अल्प आघाडी मिळालेल्या भारताकडून दुसऱ्या डावात चांगल्या खेळाची अपेक्षा होती. मात्र गोलंदाजीस अनुकूल झालेल्या खेळपट्टीवर विंडीजच्या गोलंदाजांनी भेदक मारा केला. केमार होल्डरने भारताचे सलामीचे फलंदाज प्रियांक पांचाळ (6) व अभिमन्यु ईश्वरन (3) या दोघांनाही पायचीत केले. दुसऱ्या बाजूने मिग्वेल कमिन्सने मयांक अग्रवाल (5) याला बाद करीत भारताला आणखी एक धक्का दिला. दुसऱ्या दिवसअखेर शहबाज नदीम व शुभमन गिल हे अनुक्रमे 5 व 2 धावांवर खेळत होते.
संक्षिप्त धावफलक
भारत “अ’ 201 व 9 षटकांत 3 बाद 23, वेस्ट इंडिज- 72.4 षटकांत सर्वबाद 194 (जेरेमी सोलोझानो नाबाद 69, सुनील ऍम्ब्रीस 43, जेर्मीन ब्लॅकवुड 22, कृष्णप्पा गौतम 6-67, उमेश यादव 2-29)