इम्फाळ – मणिपूरच्या इंफाळ खोऱ्यात एका २३ वर्षीय ग्रामस्थ स्वयंसेवकाच्या हत्येनंतर त्या भागातील नागरीकांच्या समितीने ४८ तासांचा बंद पुकारल्यामुळे शनिवारी मणिपुरातील सामान्य जनजीवन विस्कळीत झाले. नागरी समाज संघटनांच्या नेत्यांचा समावेश असलेल्या संयुक्त कृती समितीने पहाटे ५ वाजल्यापासून हा बंद पुकारला होता.
१७ जानेवारी रोजी मणिपूरच्या कांगपोकपी जिल्ह्यात दोन समुदायांमध्ये झालेल्या गोळीबारात गावातील स्वयंसेवक ठार झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. इम्फाळ खोऱ्यात बाजारपेठा आणि इतर व्यापारी आस्थापने बंद राहिली, तर सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू झाल्या नाहीत.
कार्यालयांमध्येही उपस्थिती कमी असल्याचे सांगण्यात आले. आतापर्यंत कोणतीही अनुचित घटना घडली नसल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. डोंगरी जिल्ह्यांना मात्र बंदचा फारसा फटका बसला नाही. या हत्येमागे असलेल्यांना तातडीने अटक करण्याची मागणी नागरीक समितीने केली आहे.