– विजय लाड
कोयनानगर – विधानसभेत लक्षवेधी सूचनांमध्ये लातूर व धाराशिव जिल्ह्यांतील भूकंपग्रस्त तालुक्यांच्या समावेश कोयना भूकंपग्रस्त पुनर्वसन न्यासमध्ये करण्याची मागणी करण्यात आली. यावर मंत्री शंभूराज देसाई यांनी सभागृहात कोयना भूकंपग्रस्त पुनर्वसन न्यासाच्या निर्मितीची पार्श्वभूमी सांगत यामध्ये अन्य भूकंपग्रस्त तालुक्यांचा समावेश करता येणार नसल्याचे स्पष्ट केले.
तसेच कोयनेच्या धर्तीवर किल्लारी भूकंपामुळे बाधित लातूर व धाराशिव जिल्ह्यांतील भूकंपग्रस्त तालुक्यांसाठी स्वतंत्र पुनर्वसन समिती किंवा न्यास स्थापन करण्याच्या दृष्टीने मदत व पुनर्वसन विभागाद्वारे सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासित केले. नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये सभागृहात लक्षवेधी सूचनांवरील चर्चेदरम्यान
ज्ञानराज चौगुले व अभिमन्यू पवार यांनी लातूर व धाराशिव जिल्ह्यांतील भूकंपग्रस्त तालुक्यांच्या समावेश कोयना भूकंपग्रस्त पुनर्वसन न्यासमध्ये करण्याची मागणी केली. या मागणीवरुन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील व राज्याचे विद्यमान उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाणे व सातारा जिल्ह्यांचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी या मागणीला प्रखर विरोध केला.
दरम्यान, ज्ञानराज चौगुले व अभिमन्यू पवार यांच्या लक्षवेधी सूचनेवर शंभूराज देसाई यांनी सभागृहास कोयना भूकंपग्रस्त पुनर्वसन न्यासाची पार्श्वभूमी सांगितली. 1967 मध्ये कोयना भूकंपानंतर राज्य, देश आणि देशाबाहेरूनही आर्थिक मदत प्राप्त झाली होती. त्या निधीतून पुनर्वसनाचे मदतकार्य करण्यात आले. त्यावेळी लोकनेते बाळासाहेब देसाई मंत्री होते.
त्यांनी शिल्लक निधीच्या वापराबाबत कोयना भूकंपग्रस्त पुनर्वसन न्यासाची स्थापना केली. या न्यासामार्फत शिल्लक निधीच्या मुदत ठेवीतून मिळणाऱ्या व्याजाच्या रकमेतून कोयना भूकंपग्रस्त सहा तालुक्यांमध्ये आजवर पुनर्वसनाची कामे करण्यात येत आहेत, अशी माहिती दिली.
तसेच कोयना भूकंपग्रस्त पुनर्वसन न्यास धर्मादाय आयुक्तांकडे नोंद असलेला ट्रस्ट असून त्यात नव्याने अन्य तालुक्यांचा समावेश करता येणार नाही. परंतु, त्याच धर्तीवर किल्लारी भूकंपामुळे बाधित लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांतील भूकंपग्रस्त तालुक्यांसाठी स्वतंत्र पूनर्वसन समिती किंवा न्यास स्थापन करण्याच्या दृष्टीने मदत व पूनर्वसन विभागाद्वारे सकारात्मक विचार केला जाईल. त्याचबरोबर याबाबत महिनाभरात मंत्रालयात बैठक घेण्यात येईल, असेही देसाई यांनी सभागृहास यावेळी स्पष्ट केले आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी एकवटले
ज्ञानराज चौगुले व अभिमन्यू पवार यांनी मांडलेल्या लक्षवेधी मागणीवरुन पश्चिम महाराष्ट्रातील कराड दक्षिणचे आमदार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कराड उत्तरचे आमदार माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील व पाटणचे आमदार राज्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी या प्रश्नाला प्रखर विरोध केला. कोयनेच्या या प्रश्नावर पश्चिम महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी प्रथमच एकत्र आल्यामुळे धाराशिव व लातूर येथील लोकप्रतिनिधींचा तिळपापड झाल्याचे दिसून आले.