नागपूर – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेण्याचा निर्णय चुकीचा होता. हा निर्णय घाईघाईने घेतला गेला, असे सांगत, केंद्रीय यंत्रणा ज्या प्रमाणे तपास करत आहेत त्याप्रमाणे राज्यातील यंत्रणा तपास करत आहेत. कोण कोण आत जाते ते आता पाहू, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला.
शिवसेनेच्या शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने संजय राऊत सध्या नागपूर दौऱ्यावर आहेत. येथे पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, नवाब मलिक यांचा आम्ही राजीनामा का घ्यावा? तुम्ही चुकीच्या आरोपांवर आमच्या मंत्र्यांना फसवत आहात.
अनिल देशमुखांचा राजीनामा घेणे ही चूक होती. नव्हता घ्यायला पाहिजे. तो निर्णय घाईघाईने झाला. त्यांच्याबाबत काय पुरावे आहेत हे आम्ही पाहिले आहे. ज्या कारणासाठी केंद्रीय तपास यंत्रणांनी त्यांच्यावर धाडी घातल्या, तेही आम्ही पाहिलं आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
महाराष्ट्र पोलीसही आता काम करत असल्याचं संजय राऊतांनी सांगितलं. नवाब मलिक नेहमीच कॅबिनेटमध्ये राहतील. भाजपाचा भ्रम होता की पूर्ण कॅबिनेट खाली करतील. ठीक आहे. आम्ही बघू. जशा तुमच्याकडे केंद्रीय तपास यंत्रणा आहेत, तसे महाराष्ट्रातील पोलीसही आता काम करत आहेत. आता कळेल की कॅबिनेट जेलमध्ये जातंय की अजून कुणी? असा इशारा राऊत यांनी दिला.
सात वर्षात 19 जणांवर आरोप सिद्ध
ईडीवर टीका करताना संजय राऊतांनी आकडेवारी सादर केली. ईडीने गेल्या 7 वर्षांत केलेल्या कारवाया आणि टाकलेल्या धाडींपैकी फक्त 19 लोकांवर आरोप सिद्ध झाले आहेत, असं राऊत म्हणाले.