जालना – महाविकास आघाडी म्हणून आपण एकत्र काम केले पाहिजे. पण शिवसेनेला डिवचण्याचे काम जर महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी कॉंग्रेस करत असेल तर शिवसैनिकांकडून पण तसेच उत्तर मिळेल, असा इशारा मावळ मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी दिला.
जालना येथे पत्रकारांशी बारणे बोलत होते. राष्ट्रवादीच्या देशमुख यांनी फेसबुकवर पोस्ट करून मागणी केली आहे की मावळ लोकसभा मतदारसंघ पार्थ पवार यांच्यासाठी सोडण्यात यावा. तुम्हाला राज्यसभेवर पाठवण्यात यावे, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे. त्याकडे लक्ष वेधत बारणे म्हणाले, राष्ट्रवादीच्या कुठल्या कार्यकर्त्याने पोस्ट टाकली त्याला मी ओळखत नाही.
लोकसभेच्या निवडणुकीला दोन वर्षांपेक्षा अधिक काळ आहे. अशा पोस्ट टाकून संभ्रमावस्था निर्माण करतात. तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की, त्यांचा बोलवता धनी कोण आहे का? अशा कार्यकर्त्याला पुढे करून अशा गोष्टींना खतपाणी घातलं का हे तपासले पाहिजे.
या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षप्रमुख राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूर्ण विश्वास टाकून 2014 आणि 2019 या दोन्ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी दिली. मी मतदारसंघामध्ये लोकांचं काम करतोय, हित जोपासतोय. पण राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना थोपवण्याचं काम राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं पाहिजे, असंही म्हटलं आहे.
लोकसभेला तुम्ही पार्थ पवार यांचा पराभव केला म्हणून अशी भूमिका राष्ट्रवादीकडून घेतली जातेय का?, असा प्रश्न विचारण्यात आला असता बारणे यांनी म्हटले, तुम्ही ते त्यांना म्हणजेच राष्ट्रवादीला विचारलं पाहिजे. जे भूमिका घेतात त्यांना विचारा. पण कार्यकर्त्यांच्या माध्यमातून शिवसेनेला डिवचण्याचं काम राष्ट्रवादीने करू नये एवढंच मी सांगतो, असे बारणे म्हणाले.