मुंबई- नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेनं भाजप-शिवसेना व मित्र पक्षांच्या महायुतीला सत्तास्थापनेचा कौल दिला होता. त्यामुळं महायुतीनं सत्ता स्थापन करणं अपेक्षित होतं.
मात्र, शिवसेनेनं अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री राहणार असल्याचा मुद्दा लावून धरला होता. तर, एकीकडे भाजप मुख्यमंत्री पद सोडण्यास राजी नव्हता. त्यामुळं निकाल लागून १४ दिवस उलटल्यानंतरही सत्तास्थापनेचा पेच सुटू शकला नाही.
अखेर आज देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला आहे.
दरम्यान, राजीनामा दिल्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद लाईव्ह
१. आताच राज्यपालांना भेटून राजीनामा सादर केला, त्यांनी तो स्वीकारला.
२. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा, सर्व सहकारी, अधिकारी, माझ्या सोबत असलेले मित्रपक्ष आणि त्यांच्या नेत्यांचे आभार
३. प्रमाणिकपणे पारदर्शकपणे महाराष्ट्रात काम करण्याचा प्रयत्न केला. मागील 5 वर्षातील 4 वर्ष दुष्काळाची, हे वर्ष अतिवृष्टीचं, या सर्व संकटांमध्ये शेतकऱ्यांच्या मागे उभं राहण्याचं काम आमच्या सरकारनं केलं.
४. महायुतीला जनतेने संपूर्ण बहुमत, 160 पेक्षा जास्त जागा आम्हाला, 105 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला, लढलेल्या जागांपैकी 70 टक्के जागांवर विजय
५. निकालाच्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी पहिल्याच पत्रकार परिषदेत सरकार बनवण्याचे सर्व मार्ग खुले असल्याचं सांगितलं होतं, तो आमच्यासाठी धक्का होता, कारण जनतेने महायुतीला मतदान केलं होतं
६. मी पहिल्याच पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आभार मानत महायुतीचं सरकार येईल असं म्हटलं होतं
७. : माझ्यासमोर कधीही अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रिपदाचा विषय झाला नव्हता, हे पुन्हा सांगतो
८. अमित शाहांना विचारणा केली, तेव्हा त्यांनीही अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रिपदाची चर्चा झाली नसल्याचं सांगितलं, कोणाला खोटं पाडण्याचा प्रश्नच नव्हता, परंतु चर्चेने हा विषय मिटवता आला असता
९. उद्धवजी ठाकरेंच्या वक्तव्याने धक्का
१०. चर्चा आम्ही थांबवलेली नाही, दारं खुली होती, परंतु चर्चा शिवसेनेकडून बंद झाली, यात पूर्ण सत्य आहे
११. शिवसेनेला काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत चर्चा करायला वेळ होता, परंतु आमच्याशी चर्चा करायची तयारी नव्हती
१२. उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूची लोकं ज्याप्रकारे वक्तव्य करत आहेत, त्यांनी सरकार होत नसतं, आम्हाला उत्तर देता येत नाही, असं समजू नये. आम्ही जोडणारे आहोत, तोडणारे नाही
१३. विरोधीपक्षातील नेत्यांनी केलेली वक्तव्य आम्ही समजू शकतो, पण आमच्या सोबत केंद्रात आणि राज्यातही राहायचं आणि खालच्या पातळीवर टीकाही करायची, हे चालणारं नाही
१४. भाजप सरकार तयार करताना कोणतंही फोडाफोडीचं राजकारण करणार नाही, आरोप करणाऱ्यांनी पुरावे द्यावे, अन्यथा माफी मागावी
१५. सरकार स्थापन करण्यास जो विलंब झाला, त्याला जो कोणी कारणीभूत असेल, तरीही मला खंत वाटते.