राजेगाव- येथे गेल्या आठ दिवसांपासून अनेक लहान-मोठ्या चोऱ्या झाल्या आहेत, याची दखल घेऊन दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार श्रीरंग शिंदे यांनी रात्रीच्या वेळी संपूर्ण गावात पायपीट करून गस्त घातली. गावातील काही युवकांना बरोबर घेऊन गावातील मुख्य रस्ते व मुख्य ठिकाणावरून गस्त घालून नागरिकांच्या मनातील चोरांविषय असेली भीती कमी केली आणि नागरिकांना दिलासा दिला आहे.
दौंड तालुक्यातील देऊळगाव राजे, मलठण, वाटलुज, नायगाव आणि राजेगाव या भागांतील गावांत पोलीस गस्त चालू असल्याची माहिती पोलीस हवलदार श्रीरंग शिंदे यांनी दिली. यावेळी शिंदे म्हणाले की, नागरिकांना आपल्या घराच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, घराचे दरवाजे, खिडक्या उघड्या ठेऊ नयेत. घराचा परिसत प्रकाशमय ठेवावा. गेल्या अनेक वर्षांपासून शिंदे यांनी बारामती, भिगवण या भागांतील विविध गुन्ह्यांचा तपसा योग्य पद्धतीने लावला असल्याने त्यांना या भागाचाही चांगली माहिती आहे. लवकरच गावागावांत ग्रामसुरक्षा दल स्थापन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. गावातील युवकांनी रात्रीच्या वेळी गस्त घालणौयाचे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.