मंचर (प्रतिनिधी) – सध्या कडक उन्हाळा असून या उन्हाचा सर्वात जास्त त्रास हा शेतकरी वर्गाला होत असून शेतीची कामे ही उन्हात करावी लागतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी सकाळी, सायंकाळी शेतीची कामे करण्यास भर द्यावा, शेतीच्या कामाचे वेळापत्रक तयार करावे, असे मत मंचर येथील वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. विनायक खेडकर यांनी व्यक्त केले.
यावेळी मंचर येथील विनायक हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. खेडकर यांनी सांगितले की यावर्षी मोठ्या प्रमाणात उन्हाचा पारा वाढला असून शेतकऱ्यांनी शेती कामे करताना सकाळी सात ते अकरा व सायंकाळी चार ते सहा यादरम्यान शेती कामे करण्यास भर द्यावा. तसेच शेती पिकांना फवारणी करताना योग्य ती काळजी घ्यावी शेती पिके फवारणी करताना वापरली जाणारी औषधे ही त्वचा, डोळे, तोंडावाटे शरीरात जातात व त्याचा परिणाम शरीरावर होतो.
त्यामुळे फवारणी करताना हातमोजे, चष्मा, तोंडाला रुमाल, पूर्ण शरीर झाकले जाईल, असे कपडे वापरावे. उष्माघाताचे प्रमाण वाढले असून याचा त्रास शेतकरी वर्गाला होऊ शकतो. तसेच शेती कामे करताना सुती कपडे, डोक्यावर टोपी वापरावी. उन्हाळ्याच्या दिवसात बाहेरच्या अन्नपदार्थ, उघड्यावरील अन्न, थंडपेय सेवन करू नये अन्यथा आजाराला निमंत्रण दिले जाऊ शकते.
उन्हाळ्याच्या दिवसात नागरिकांनी लिंबू सरबत, ताक, उसाचा रस, कैरीचे पन्हे याचे सेवन केल्यास शरीरात पाण्याची पातळी समतोल राहते व उन्हाचा जास्त त्रास होत नाही. तसेच आपले शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी सकाळी पहाटे केलेला व्यायाम हा सर्वोत्तम व्यायाम असून त्याचा फायदा शरीराला होतो जेवल्यानंतर शतपावली करावी जेवण झाल्यानंतर व्यायाम करू नये, असा सल्लाही त्यांनी दिला.
अलीकडच्या काळात तरुणांच्या जीवनशैलीत मोठा बदल झाला असून आहाराचा समतोल राहिलेला नाही. बाहेरील अन्नाचा वापर जास्त केला जातो. त्याचा शरीरावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. तसेच तरुण वर्ग व्यायाम, जिम करताना शरीर तंदुरुस्त करण्यासाठी विवीध प्रोटीन पावडर, इंजेक्शन घेत असल्याचे प्रकार घडत असून यामुळे तरुण वयातच हृदयविकाराचे झटके येण्याचे प्रमाण वाढले आहेत. – डॉ. विनायक खेडकर, मंचर.