नवी दिल्ली : करोना शिखर (सर्वोच्च) पातळीवर तीन मेपर्यंत किंवा कधी पोहोचेल, हे आपण सांगू शकत नाही. मात्र करोना बाधित वाढीचा वेग हा सुरवातीपासून 4.5 टक्के कायम आहे. त्यामुळे करोनाला आपण जमीनदोस्त करू शकतो, असा विश्वास भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने (आयसीएमआर) व्यक्त केला आहे.
आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी दैनंदिन वार्तालापात ही माहिती दिली. ते म्हणाले करोना बाधितांच्या संख्येत वाढीचा वेग हा सातत्याने एकच म्हणजे 4.5 टक्केच आहे. त्यामुळे अन्य देशांत झाले तसे त्याची शिखर पातळी कधी येईल हे सांगता येत नाही. त्याचा अंदाज बांधणे कठीण आहे.
करोना मुकाबला गटाचे प्रमूख सी. के. शर्मा म्हणाले, करोना बाधितांपैकी चार हजार 257 जण बरे झाले आहेत. 23 मार्चला लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते, त्यादिवशी 14 हजार 915 चाचण्या घेण्यात आल्या होत्या 22 एप्रिलला ती संख्या पाच लाखांवर गेली आहे. या काळात चाचण्या 33 टक्क्यांनी वाढवल्या आहेत तर बाधितांची संख्या 16 टक्क्यांनी वाढली आहे. अर्थात चाचण्याच्या संख्येत झालेली वाढ पुरेशी नाही. ती आणखी वाढवायला हवी, असे ते म्हणाले.
गेल्या 14 दिवसांत 78 जिल्ह्यात एकही नवा करोनाबाधित आढळलेला नाही. तर गेल्या 28 दिवसांत 12 जिल्ह्यांमध्ये करोनाचा एकही नवा बाधित आढळलेला नाही, असे आरोग्य खात्याचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले. ते म्हणाले, गेल्या 24 तासांत एक हजार 409 नवे बाधित सापडले असून बाधितांची संख्या 21 हजार 393 वर पोहोचली आहे.
देश सध्या कठीण काळातून जात आहे. पण साथीच्या प्रसाराचा वेग अन्य काही प्रगत देशांच्या तुलनेने खूपच कमी आहे. लॉकडाऊनला आज महिना पूर्ण होत आहे. या काळात संसर्ग कमी करण्यात, किमान प्रसार आणि बाधित दुप्पट होण्याचा कालवधी वाढवण्यात आपण यशस्वी ठरलो आहोत. या काळत आपण भविष्याची तरतूद करत आहोत. वाढ कमी-जास्त होत आहे. पण त्याचा स्फोट झालेला नाही
सी. के मिश्रा
प्रमुख, करोना मुकाबला गट