प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी
मुंबई: राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील बंगल्यावरील घटनेच्या दिवसाचं सीसीटिव्ही फूटेज तातडीने हस्तगत करून ते ठाणे जिल्हा दंडाधिकारी न्यायालयात जमा करावे. तसेच यावर राज्य सरकारने 30 एप्रिलपर्यत भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.
मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण झाल्याची तक्रार ठाण्यातील एका तरुणाने केली आहे. अनंत करमुसे असे या तरूणाचे नाव असून तो कासारवडवली येथे राहायला आहे. वर्तक नगर पोलीस स्थानकांत यासंदर्भात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. मात्र या प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत करावा अशी मागणी करत करमुसे यांनी आता मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर पार पडलेल्या प्राथमिक सुनावणीनंतर न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी यांनी हे निर्देश दिले आहेत.
तक्रारदार तरुणाच्या दाव्यानुसार जितेंद्र आव्हाड हे सत्ताधारी पक्षात असून ते राज्य सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपदावर आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात पोलीस कदाचित निष्पक्ष चौकशी करू शकणार नाहीत. तेव्हा या प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. अनंत करमुसे यांनी समाज माध्यमांवर केलेल्या काही पोस्टचा राग आल्याने जितेंद्र आव्हाड यांच्या सांगण्यावरून त्याला मारहाण करण्यात आली आहे. ज्यावेळी मारहाण झाली त्यावेळी आव्हाड हे समोर उभे होते, असेही या तरुणाचे म्हणणे आहे. दरम्यान, न्यायालयाने याचिकेची सुनावणी 30 एप्रिलपर्यत तहकूब ठेवली.