मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी बंड केल्यानंतर मुख्यमंत्रीपदावरून उद्धव ठाकरे यांना पायउतार व्हावे लागले होते. त्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्या शिवसेना नाव आणि धनुष्यबाण या चिन्हावरून वाद सुरू झाला. यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. यातच आता ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडाबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. “भाजपसोबत जाऊ या ,नाहीतर मला अटक होईल. असे म्हणत ते मातोश्रीवर येऊन रडले होते”, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे. या विधानाची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
आदित्य ठाकरे यांनी हैदराबाद येथील गितम विद्यापीठाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात हा दावा केला आहे. आदित्य ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांच्या बंडाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, “शिवसेना सोडून गेलेले 40 आमदार हे स्वत: साठी आणि पैशांसाठी गेले आहेत. केंद्रीय यंत्रणांकडून अटक होणार होती, म्हणून सध्याचे मुख्यमंत्री आमच्या घरी येऊन रडले होते. जर भाजपसोबत गेलो नाही तर ते मला अटक करतील, असे ते म्हणाले होते.”
दरम्यान, राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नऊ महिन्यांपूर्वी भाजपसोबत येऊन नवे सरकार स्थापन केले. यानंतर राज्यात अनेक घडामोडी घडत गेल्या. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले. मात्र महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टाकडून अद्याप जाहीर झालेला नाही. पण याचा युक्तिवाद पूर्ण झाला असून, लवकरच हा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. परंतु त्याआधीच आदित्य ठाकरेंनी केलेल्या विधानामुळे साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.