संगमनेर – शहरालगत असणाऱ्या प्रवरा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या वाळू उपसली जात असून, पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. काही केल्या वाळूउपसा बंद होत नसल्याने संगमनेरकरांनी बुधवारी सकाळी शहरातील गंगामाई घाट परिसरात आंदोलन सुरू केले. या वेळी आंदोलनकर्ते प्रशासनावर आक्रमक झाल्याचे दिसून आले. तालुक्यातील वाळूतस्करांनी नद्या अक्षरशः ओरबाडून काढल्या आहेत. विद्यमान महसूलमंत्र्यांनी वाळू बंद करून तस्करांचा बंदोबस्त केला असला, तरी संगमनेर तालुका याला अपवाद राहिल्याचे दिसून येते. याला जबाबदार स्थानिक महसूल प्रशासन की मंत्र्यांचे अपयश असा सवाल संगमनेरकर करत आहेत.
संगमनेर खुर्द येथील मोठ्या पुलापर्यंत रात्रंदिवस अवैधरीत्या वाळू उपसली जात आहे. त्यामुळे नदी परिसरातील पुरातन घाट, मंदिरांना धोका निर्माण झाला आहे. येथून वाळूउपसा बंद व्हावा, अशी गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. मात्र, याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. शहरातील प्रवरा नदीचा परिसर निर्सगरम्य आहे. येथे नगर परिषदेतर्फे सुशोभीकरण करण्यात आले. मात्र, या परिसराची अवैधरीत्या सुरू असलेल्या वाळूउपशाने मोठी हानी झाली आहे. नदीपात्रात मोठे खड्डे पडले असून, पोहायला अथवा गणेश विसर्जनासाठी आलेल्या अनेकांचा खड्ड्यांमध्ये बुडून मृत्यू झाला.
पुरातन व नवीन घाट देखील खचले आहेत. पात्रातील विहिरी व जलवाहिन्या उघड्या पडल्या आहेत. विहिरींची पाण्याची पातळी खालावली आहे. पर्यावरणाच्या होत असलेल्या ऱ्हासाकडे प्रशासकीय अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. वाळूउपसा न थांबल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा या वेळी आंदोलनकर्त्यांनी दिला. तर तालुक्यातील वाळूतस्करांना महसूल प्रशासनाचा धाक राहिला नसून, परिसरातून सर्रास वाळूउपसा होत आहे. अधिकारी मंत्र्यांचे ऐकत नसल्याचे दिसून येत असल्याच्या प्रतिक्रिया स्थानिक नागरिक देत आहेत.