मुंबई – महात्मा गांधी यांनी ब्रिटिश सत्तेला मुंबईतूनच “चलो जाव’चा नारा दिला होता. आता मोदी सरकारलासुद्धा मुंबईतील बैठकीतूनच “चले जाव’चा नारा दिला जाईल, अशी माहिती कॉंग्रसे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईत 31 ऑगस्ट व 1 सप्टेंबर अशी दोन दिवस होणार आहे. या बैठकीत 31 ऑगस्टला इंडिया आघाडीच्या लोगोचे अनावरण केले जाणार आहे. यासंदर्भात गांधी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
नाना पटोले म्हणाले, मुंबईत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीला आगळंवेगळं महत्त्व आहे. एनडीएमधील काही पक्षही इंडिया आघाडीत सहभागी होऊ शकतात. या बैठकीला नितिशकुमार, ममता बॅनर्जी, केजरीवाल यांच्यासह 6 मुख्यमंत्री, विविध पक्षांचे अध्यक्ष उपस्थित असतील, असे त्यांनी सांगितले.
इंडिया आघाडीमध्ये पंतप्रधानपदासाठी अनेक सक्षम उमेदवार आहेत, भाजपाकडेच या पदासाठी उमेदवार नाही. नरेंद्र मोदींना जनता कंटाळली आहे, त्यांची लोकप्रियता झपाट्याने घसरत आहे. इंडिया आघाडीचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असेल यावर आघाडी निर्णय घेईल. पण कॉंग्रेसचा एक कार्यकर्ता म्हणून राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत, ही आमची भावना आहे.
एका प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून अजित पवार यांच्याबरोबर काही सहकारी भाजपशी हातमिळवून सत्तेत सहभागी झाले ते ईडीच्या धाकाने, विकासासाठी नाही, हे शरद पवार यांनीच स्पष्ट केले आहे. हेच लोक मागील अनेक वर्षांपासून सत्तेत होते.