पिंपरी – राज्यातील नोंदणीकृत महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनेतून अवजारे खरेदीसाठी सुमारे पाच हजार रुपये प्रत्येक कामगारांना देण्यात येत होते. सध्या बंद असलेली ही योजना पुन्हा नव्याने सुरू करण्यासाठी कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्याची माहिती कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी दिली.
राष्ट्रवादी कॉंग्रेस, कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे शनिवार (दि.16) रोजी पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेऊन बांधकाम कामगारांच्या मागणीकडे लक्ष वेधण्यात आले. यावेळी कामगार नेते नखाते, उपाध्यक्ष राजेश माने, भास्कर राठोड, सुखदेव कांबळे, गौतम हातागळे आदी उपस्थित होते.
कल्याणकारी मंडळाच्या या योजनेचा 2017 ते 19 या कालावधीत 5 लाख 8 हजार बांधकाम कामगारांना लाभ झाला. मात्र कालांतराने ही योजना बंद करण्यात आली आहे. ही योजना पुन्हा नव्याने सुरू करण्यात आली तर राज्यातील बांधकाम कामगारांमध्ये एक आनंदाचे वातावरण निर्माण होऊन राज्यातील महाविकास आघाडी व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या दृष्टीने हा महात्वाचा निर्णय होणार आहे. त्यामुळे अवजारे खरेदीसाठी पुन्हा अर्थसहाय्य योजना सुरू करण्यात यावी, अशी मागणी पत्राद्वारे उपमुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. या मागणीला उपमुख्यमंत्री पवार यांनी सत्कारात्मक प्रतिसाद दिला आहे.