खोडद -ठाकरवाडी (ता. जुन्नर) परिसरात अनेक महिन्यांपासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यामध्ये जेरबंद करण्यात यश आले आहे, त्यामुळे या भागातील नागरिक व शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असले तरी या भागात अद्यापही दोन बिबटे फिरत असल्याच्या चर्चेमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे.
महाळुंगे खिंडीजवळील ठाकरवाडी येथील जालिंदर सुभाष वऱ्हाडी यांच्या शेतातील ओढ्याजवळ वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात सोमवारी (दि. 18) रात्री 11 वाजता हा बिबट्या सापडला. गेल्या अनेक महिन्यांपासून ठाकरवाडी मधील वारुळे वस्ती, मेहेर वस्ती, बनकर वस्ती व डोंगराच्या पायथ्याजवळ असलेले ठाकर समाजाच्या वस्त्यांमध्ये 3 बिबट्यांनी धुमाकूळ घातला होता. हे बिबटे रात्रीच्या वेळी वस्तीवर येऊन भटकी व पाळीव कुत्री खात होते.
तसेच या भागातून डिंभे डावा कालवा जात असून कालव्याजवळ पाणी पिण्यासाठी आलेले हे बिबटे या भागातील काही शेतकऱ्यांनी एकत्र फिरताना पहिले होते. त्यामुळे रात्रीच्या वेळी शेतात पाणी भरण्यासाठी किंवा इतर कामांसाठी बाहेर पडणे मुश्कील झाले होते.
शेतकरी व नागरिकांच्या मागणीनुसार वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात हा बिबट्या जेरबंद झाला असला तरी अजून 2 बिबटे या भागात रात्रीच्या वेळी येत असून ते पुन्हा डोंगर भागात असलेल्या महाळुंगे खिंडीजवळ निर्जन भागात जात आहेत. राहिलेल्या 2 बिबट्यांनाही लवकरात लवकर पकडावे, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.