मुंबई – विधानपरिषदेच्या सहाव्या जागेवरुन महाविकास आघाडीतील पेच संपला आहे. कॉंग्रेसने सहाव्या जागेसाठी आग्रह सोडत माघार घेतल्याने आता विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे 5 उमेदवार आणि भाजपचे 4 उमेदवार बिनविरोध विधान परिषदेवर निवडून जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आघाडीत शिवसेना 2, राष्ट्रवादी 2 आणि कॉंग्रेस एका जागेवर उमेदवारी अर्ज दाखल करेल.
याबाबत कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी स्वतः महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर माहिती दिली. बाळासाहेब थोरात म्हणाले, विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक होत आहे. सोमवारी (11 मे) अर्जाचा शेवटचा दिवस आहे. आमची अपेक्षा महाविकास आघाडीने 6 जागा लढवावी अशी होती. मात्र, एकंदर करोनाचे असलेले संकट आणि त्या पार्श्वभूमीवर सर्व आमदारांना मतदानासाठी मुंबईला आणणे हे अवघड आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील यात उमेदवार आहेत. त्यांनी स्वतः ही निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली. त्यामुळे सर्व गोष्टींचा विचार करुन आम्ही महाविकास आघाडीने 5 जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे, असे सांगितले.
दरम्यान, याआधी महाविकास आघाडीने 6 उमेदवारांची घोषणा केली होती. त्यात कॉंग्रेसच्या 2 उमेदवारांचा समावेश होता. मात्र, आता कॉंग्रेसच्या वाट्याला एकच जागा आली आहे. त्यामुळे सहाव्या जागेसाठी माघार घेतल्यानंतर कॉंग्रेसकडून त्यांच्या दोन उमेदवारांपैकी कोणत्या एका उमेदवाराची निवड होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.