मुंबई : भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावर शिवाजी पार्क मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आल्यावर याच ठिकाणी त्यांचे स्मारक उभे करण्याची मागणी आता करण्यात येत आहे. त्यावरून सध्या राज्यात दोन गट निर्माण होताना दिसत आहे. भाजपा व काँग्रेसने या मागणीला पाठिंबा दिला आहे तर दुसरीकडे भारिप बहुजन महासंघाचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शिवाजी पार्क मैदान हे खेळासाठीच असावे, अशी भूमिका मांडली आहे. आपला या मागणीला विरोध असल्याचे स्पष्ट मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे.
शिवाजी पार्क येथे लता मंगेशकर यांचं स्मारक उभारण्यासंदर्भात प्रकाश आंबेडकर यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना, “मुंबईत आधीच मुलांना खेळण्यासाठी मैदाने उपलब्ध नाहीत, अशा वेळी शिवाजी पार्क मैदानात स्मारक उभारणे चुकीेचे ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. तसेच या मागणीला माझा विरोध आहे. शिवाजी पार्क हे शिवाजी पार्कच राहिलं पाहिजे. त्याला स्मशानभूमीमध्ये कनव्हर्ट करु नये या मताचा मी आहे. बाजूला एक स्मशानभूमी आहे ती चांगलीय मोठीय,” अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली.
तसेच, प्रकाश आंबेडकर यांनी, “हे एकमेव मैदान आहे जिथं खेळता येतं. इथं शाळा, कॉलेजचे, क्लबचे सामने होतात. व्यक्तींचं स्मारक करायचं असेल तर अनेक ठिकाणी अनेक वेगवेगळ्या जागा आहेत. मुलांच्या खेळाच्या मैदानावर अतिक्रमण करावं असं मला वाटत नाही,” असे रोखठोक मत त्यांनी यावेळी मांडले आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर शिवाजी पार्क मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले होते व तेथेच त्यांचे स्मारक उभारण्यात आले. लता मंगेशकर यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यावर मैदानातच स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी भाजपाचे आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
लता मंगेशकर यांच्यावर शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार झाले, जेथे त्या पंचत्वात विलीन झाल्या, तेथेच त्यांचे स्मारक उभारावे, अशी करोडो रसिकांची, जनतेची मागणी आहे. हे स्मारक सर्वाना प्रेरणादायी ठरेल, असे राम कदम यांनी म्हटले आहे. कदम यांच्या मागणीनंतर स्मारकावरून चर्चा सुरू झाली.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही शिवाजी पार्क मैदानात स्मारक उभारण्याची मागणी केली. लताबाईंच्या स्मारकाला भेट दिल्यावर त्यांचा जादूई, गोड आवाज स्मरणात राहील, पुढील पिढय़ांना प्रेरणा मिळेल, असे भव्य व आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक शिवाजी पार्क येथे उभारावे, असे पटोले यांनी म्हटले आहे. लता मंगेशकर यांच्या स्मारकावरून नाहक राजकारण करू नका, असे मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.