तिरुवनंतपुरम ( leave for menstrual cycle in keral ) – केरळमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना मासिक पाळी रजा देण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. या निर्णयाची घोषणा केरळच्या उच्च शिक्षण मंत्री आर. बिंदू यांनी असून त्यांनीच या निर्णयाची माहिती फेसबुक पोस्ट लिहून दिली आहे.
विद्यार्थिनी व नोकरी करणाऱ्या महिलांना मासिक पाळी रजा लागू करावी, अशी मागणी करणारी जनहित याचिक सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे. देशभरातील शैक्षणिक संस्था व कार्यालयांना मासिक पाळीची रजा देण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेवर अजून सुनावणी झालेली नाही.
त्याआधीच केरळ सरकारने महाविद्यालयीन विद्यार्थिंनींसाठी मासिक पाळीची रजा जाहीर केली आहे. याआधी बिहार सरकारने मासिक पाळी रजा जाहीर केली आहे. तसेच झोमॅटो, बायजूस् कंपन्यांमध्ये मासिक पाळीसाठी भरपगारी रजा दिली जाते. त्यामुळे केरळ सरकारने घेतलेल्या निर्णयाचे अनुकरण अन्य राज्य करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्रातही मासिक पाळीसाठी रजा द्या- जितेंद्र आव्हाड
महाविद्यालयीन विद्यार्थिनींना मासिक पाळीसाठी रजा देण्याच्या केरळ सरकारच्या निर्णयाचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कौतुक केले आहे. तसेच अशाच प्रकारचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घ्यावा, अशी मागणी माजी मंत्री आव्हाड यांनी ट्विट करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.