Jitendra Avhad On Fadanvis | ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची मॉरिश नरोन्हा याने गोळ्या झाडून हत्या केली. याप्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यावर उद्या कारखाली येऊन श्वानाचा मृत्यू झाला तरीही विरोधक माझा राजीनामा मागतील अशी प्रतिक्रिया दिली. यावरूनच जितेंद्र आव्हाड यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड ? Jitendra Avhad On Fadanvis |
देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड यांनी “महाराष्ट्रात आत्ता जी परिस्थिती आहे तशी परिस्थिती युरोपमध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या आधी निर्माण झाली होती. ज्या कुणाला राजाश्रय असेल त्याला जिवंत ठेवण्यात येत असे. ज्याचा राजाश्रय निघाला तो मृत्यूच्या दाढेत ढकलला जायचा. आज पोलिसांच्या कार्यपद्धतीत हस्तक्षेप केला जातो आहे. तसंच पोलिसांचा धाकच राहिलेला नाही.”
पुढे त्यांनी,”आपल्या राजकीय अस्तित्वासाठी पोलिसांचा वापर या तिघांच्या संगमामुळे होतो आहे. महाराष्ट्रात लोकशाही मूल्यं संपली तर कोण तरुण राजकारणात येईल? सुरक्षित वाटणार नसेल तर आम्ही कशासाठी हे सगळं करतोय? इतकं असुरक्षित वातावरण यापूर्वी महाराष्ट्रात कधीही नव्हतं. पोलिसांचा एक धाक असे, तो धाक संपला आहे याला जबाबदार सरकार आहे. सरकार कारवाई करत नाही तोपर्यंत काहीही होणार नाही.” असे म्हटले.
‘पुणे, मग कल्याण डोंबिवली आता मुंबईत गोळीबार झाला. हसतमुख मुलाचा दुर्दैवी अंत झाला. मॉरिसने स्वतःलाही मारुन घेतलं. बेकायदेशीर बंदुका येतातच कशा? एवढ्या मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय बंदुका देशात येतात कशा? १९७० पासून एकही आंतरराष्ट्रीय रिव्हॉल्वर आलेलं नाही.’
‘जे राजसत्तेच्या आश्रयाखाली आहेत ते सुरक्षित, बाकींच्या अंत्ययात्रेला यायची तयारी ठेवायची अशी परिस्थिती आहे. फडणवीस जे बोलले ते म्हणजे माणसाच्या मृत्यूला कुत्र्याची किंमत देणार असाल तर आम्ही काय बोलायचं आता?’ असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.