उत्तम पिंगळे
बारावीच्या निकालानंतर प्राध्यापक विसरभोळ्यांकडे गेलो. माझ्या हातात पेढा ठेवताना ते म्हणाले की, आमच्या क्लासचा 100 टक्के निकाल लागला, घ्या पेढे घ्या.
मी: वा… वा… सर हार्दिक अभिनंदन! आपले सर्व विद्यार्थी चांगल्या मार्कांनी पास झाले आहेत.
विसरभोळे: हो, पण काय हा निकाल. कॉलेज प्रवेशासाठी मोठी चुरस व भाऊगर्दी होणार आहे.
मी: म्हणजे आपल्याला आनंद नाही झाला का?
विसरभोळे: तसे नाही, 85 टक्केपेक्षा अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. त्यामुळे कॉलेज प्रवेशासाठी गडबड होणार आहे. कित्येक कॉलेजेसचे कटऑफ नव्वदी पार राहतील.
मी: हो, पण एवढे विद्यार्थी पास झाल्यामुळे तसेच होणार आहे. आणखी कॉलेजेस आवश्यक आहेत.
विसरभोळे: बघा इथेच चुकतो आपण. म्हणजे कॉलेजेस काढण्यावर माझी काही हरकत नाही. मीही क्लास चालवितो कारण विद्यार्थी माझ्याकडेच येतात. पण काय झाले आहे माहीत आहे का? कित्येक विद्यार्थ्यांना बारावीनंतर काहीच नाही म्हणूनही कॉलेजमध्ये जातात.आपणास माहीत आहे का, सध्याचा बेकारीचा दर सहा टक्क्यांपेक्षा जास्त आहे व तो सर्वाधिक आहे. त्यात आपण आणखी सुशिक्षित बेकारांची भर घालत आहोत.
मी: मग विद्यार्थ्यांनी शिकू नये काय?
विसरभोळे: तसे नाही, आज कितीतरी सुशिक्षित बेकार आहेत. सरकारी चतुर्थ श्रेणीच्या जाहिरातीसाठी पोस्ट ग्रॅज्युएट अर्ज करू लागले आहेत म्हणून म्हणतो.
मी: मग यावर उपाय काय?
विसरभोळे: उपाय नक्कीच आहे. आपल्याकडे रोजगार संधी वाढल्या पाहिजेत. तसेच कृषी व उद्योग एकत्र आल्यास निश्चित फरक पडू शकतो. मी पूर्वीच सांगत आलेलो आहे की, शेतकरी सुधारला तरच देश सुधारेल. शेतकऱ्यांच्या मालाला वाजवी भावाने कायम बाजारपेठ मिळणे आवश्यक असते तो केवळ उद्योगच देऊ शकतो. एकदम भरभरून पीक झाल्यास त्यावर सत्वर प्रक्रिया करून विविध पदार्थ बनवणे आवश्यक आहे. शेतमाल रास्त भावाने उठाव झाल्यावर शेतकरीही जास्त पीक काढण्याच्या मागे लागेल व उद्योगासाठीही कच्चा माल मिळेल. अशा विविध उद्योगांना मग मनुष्यबळ लागेल व रोजगार निर्मितीही होईल.
असे करताना काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. उदाहरणार्थ, येथे निर्माण होणाऱ्या वस्तूंना बाजारपेठ मिळावी म्हणून बाहेरून येणाऱ्या वस्तूंवर कर लावणे. आज अमेरिकाही तेच करत आहे. चीननेही आपली बाजारपेठ काबीज केलेली आहे. अशा वेळी आपण आपलाच माल वापरला पाहिजे तरच येथील उद्योग तरू शकतील. विदेशी कंपन्यांना मोकळे रान देत असताना अनावश्यक गोष्टींची गरज काय? साधे पिण्याचे पाणी तेही भारतातलेच व त्यावर प्रचंड नफा विदेशी कंपन्यांचा. स्वदेशी तसेच कृषी उत्पादनास हमी बाजारपेठ हे दोन मुद्दे सरकारने ऐरणीवर आणणे आवश्यक आहे. शिक्षण संपतानाच म्हणजे अगदी दहावी असो किवा बारावी असो की पदवी असो हातात नोकरी वा व्यवसाय मिळणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास शिकून फायदा काय? हा मूलभूत प्रश्न उरतोच. नव्या सरकारने याबाबतची धोरणे आक्रमकपणे पार पाडावीत हीच अपेक्षा.