अमरावती – सत्ताधारी पक्षाकडून विरोधी पक्षातील नेत्यांवर ईडीकडून कारवाई केली जात असल्याचे आरोप सतत केला जात आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात नवाब मलिक, अनिल देशमुख आणि संजय राऊत यांच्या सारख्या नेत्यांवर कारवाई करत त्यांना तुरुंगात जावे लागले.
त्यानंतर शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये देखील फुट पडल्यानंतर अजित पवार गट देखील ईडीच्या भीतीने भाजपसोबत गेल्याची टीका करण्यात आली. यासर्व घडामोडी घडत असताना काँग्रेसच्या नेत्या व आमदार यशोमती ठाकूर यांनी भाजपला थेट आव्हान दिले आहे.
काँग्रेसच्या नेत्या आणि आमदार यशोमती ठाकूर यांनी अमरावतीत एका कार्यक्रमात भाजपवर निशाणा साधला आहे. यावेळी त्या म्हणाल्या की, “लाव न बे ईडी हिम्मत असेल तर लाव ईडी. मी भीत नाही तुले बिलकुल लाव ईडी. बघतो काय निघते तर माझ्यावर ईडी लावण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे”, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला आहे.
दरम्यान, आतापर्यंत विरोधी पक्षांतील अनेक राजकीय नेत्यांवर ईडीची चौकशी लावण्यात आली आहे. त्यानंतर आता यशोमती ठाकूर यांच्या वक्तव्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. याशिवाय काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तर हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. पण त्यानंतर अजित पवार यांच्यासह त्यांचे काही सहकारी भाजपसोबत सत्तेत सामील झाले. यावरून देखील भाजपवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली.