मुंबई – लॉकडाऊन काळात वाढीव वीज बिले माफ होणार नाहीत, असे आता जवळजवळ स्पष्ट झाले आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी याबाबत खुलासा केला आहे. यानंतर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यावर मनसेही आता आक्रमक भूमिका घेतली आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ऊर्जामंत्र्यांवर टीका केली आहे. ते म्हणाले, वीज बिलासंदर्भात निवेदन, अर्ज, बैठका, विनवण्या सगळं झालं. पण सरकार ढिम्म आहे. जनतेला दिलासा देण्यासाठी साहेबांच्या आदेशानंतर रस्त्यावर संघर्ष करावाच लागेल कारण ‘लाथो के भूत बातों से नही मानते’, अशा शब्दात संदीप देशपांडे यांनी ठाकरे सरकारला थेट इशाराच दिला आहे.
वीज बिला संदर्भात निवेदन, अर्ज, बैठका, विनवण्या सगळं झालं. पण सरकार ढिम्म आहे. जनतेला दिलासा देण्यासाठी साहेबांच्या आदेशानंतर रस्त्यावर संघर्ष करावाच लागेल कारण”लाथो के भूत बातों से नही मानते”
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) November 19, 2020
दरम्यान, वीज वापरली तितकेच बिल आले पाहिजे. कोणाचेही वीज कनेक्शन कट होणार नाही, असे स्पष्टीकरण नितीन राऊत यांनी दिले. तसेच योग्य बिल नसेल तर त्याची तक्रार करावी. मीटर पाहणी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
राज्यात बिल सवलत याबाबत केंद्र सरकारने मदत करावी. पण केंद्र सरकारने मदत केली नाही. वीजबिल सवलत तूर्तास मिळेल असे वाटत नाही, असे राऊत यांनी सांगितले.