संयुक्त राष्ट्रसंघाच्या अधिकृत अहवालातील माहिती
न्यूयॉर्क : भारताची लोकसंख्या जास्त असल्यामुळे जगातील सर्व देशांसाठी ही एक बाजारपेठ मानली जाते. त्याच धर्तीवर आता जगाच्या कानाकोपऱ्यातून अमली पदार्थांचा व्यवहार करणाऱ्यांसाठी सुद्धा भारत ही एक मोठी बाजारपेठ बनली आहे. संयुक्त राष्ट्र संघाने नुकत्याच जाहीर केलेल्या एका अहवालाप्रमाणे गेल्या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये भारतात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या इंटरनॅशनल नार्कोटिक्स कंट्रोल बोर्डाने आपला वार्षिक अहवाल दोन दिवसांपूर्वी जाहीर केला असून त्यामध्ये भारतातील अमली पदार्थ व्यवहारांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या माहितीप्रमाणे, 2017 मध्ये भारतात 2146 किलोग्रॅम अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. 2022 मधील हा आकडा 7282 किलोग्राम एवढा आहे. विविध प्रकारच्या अमली पदार्थांचा विचार करता गेल्या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये अफू जप्त करण्याचे प्रमाण सर्वात जास्त वाढले असून हे प्रमाण 70 टक्के आहे भारतामध्ये समुद्रमार्गे जास्तीत जास्त अमली पदार्थ येत असतात, त्यामुळे बंदरांवर विशेष लक्ष ठेवण्यासाठी सूचना या अहवालात करण्यात आल्या आहेत.
गेल्या काही कालावधीमध्ये भारतात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात हेरॉईनही जप्त करण्यात आल्याची माहिती अहवालात देण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर भारताच्या आसपास असलेल्या काही शेजारी देशांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये ज्या कारवाया करण्यात आल्या आणि अमली पदार्थ जप्त करण्यात आले. त्यापैकी बहुतांशी अमली पदार्थ भारतातच पाठवण्यात येणार होते.
जगात भारताचा औषध निर्मिती क्षेत्रामध्ये पहिला क्रमांक आहे. त्याचाही परिणाम काही प्रमाणात अमली पदार्थांच्या व्यवहारांवर झाला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये औषधाशी संलग्न असलेल्या काही रसायनांचा वापर अमली पदार्थ म्हणून वाढला आहे. भारत सरकारने या व्यवहारांवरही नजर ठेवली असून ऑनलाईन औषधांची विक्री करण्यावर जास्त नियंत्रण लादली आहेत.