नगर (प्रतिनिधी) – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काल राज्य परिवहन विभागाच्या बससेवेला हिरवा कंदील दिला. त्यानुसार नगरच्या आगार व्यवस्थापनाने बससेवेचे नियोजनही केले. तथापि, नगरच्या तीनही बसस्थानकांत सज्ज असलेल्या लालपरीला उशिरापर्यंत प्रवाश्यांची प्रतीक्षा करावी लागली.
नगरमधील तारकपूर, माळीवाडा व पुणे बसस्थानकातून प्रवासी घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी तिन्ही बसस्थानकांची स्वच्छता करुन कर्मचाऱ्यांनी बसस्थानकांचे सॅनिटायझिंग केले होते. नगरमधून पुणे, मुंबईसाठी बसेस तयार ठेवण्यात आल्या होत्या. करोना प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन लॉकडाऊन काळात बंद करण्यात आलेली राज्य परिवहन महामंडळाची आंतर जिल्हाबस सेवा आज पूर्ववत आरोग्यविषयक नियमांचे काटेकोरपणे पालन करीत सुरु झाली.
पाच-सहा महिन्यांपासून करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील बससेवा बंद करण्यात आली. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना प्रवासासाठी वैयक्तिक वाहनांचा वापर करावा लागत होता. सार्वजनिक वाहतूक बंद असल्याने आंतरजिल्हा प्रवास करणे जवळपास थांबले होते. आता मात्र, राज्य सरकारने परवानगी दिल्यानंतर आज अधिकृतपणे या सेवेस प्रारंभ झाला.
नगर येथून नाशिक, पुणे, औरंगाबाद साठी बसेस रवाना झाल्या. आंतरजिल्हा बससेवा सुरु झाल्यामुळे अनेक नागरिकांची गैरसोय आता दूर होणार आहे. दरम्यान, राज्य परिवहन महामंडळाच्या अहमदनगर विभागीय कार्यालयाच्या सूचनांनुसार एस.टी. बसस्थानक प्रमुखांनी तारकपूर, माळीवाडा आणि स्वस्तिक बसस्थानकांची स्वच्छता करुन घेतली. एस.टी.मध्ये बसणाऱ्या प्रवाशांनाही मास्क घालण्यास सांगण्यात आले होते. स्वताचे आरोग्य सांभाळावे तसेच इतरांचे आरोग्याचीही काळजी घ्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात येत होते. बसचे वाहक आणि चालकांनीही बसेस सुरु झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.