उत्पादकांच्या गाऱ्हाण्यानंतर अर्थमंत्रालयाचा पुढाकार
मुंबई – दागिने उत्पादकांच्या समस्या सोडविण्यासाठी एक विशेष समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे दागिने उत्पादकांनी सांगितले.
या उत्पादकांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याशी चर्चा केल्यानंतर मंत्र्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले. या समितीत उत्पादकांबरोबरच, ग्राहक आणि बॅंकर्सचाही समावेश असणार आहे. ही समिती या क्षेत्रासमोरील सर्व प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करेल. जर समितीची निर्णय अयोग्य वाटला तर त्यात अर्थमंत्रालय लक्ष घालणार आहे. जेम ऍण्ड ज्वेलरी एक्पोर्ट प्रमोशन कौन्सिलने म्हटले आहे की, आता निर्यात काही प्रमाणात वाढू लागल्यामुळे या क्षेत्रात आशावाद परतू लागला आहे.
या क्षेत्राच्या बऱ्याच मागण्या आहेत. त्या सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. प्रथम या मागण्यांवर ही समिती विचार करणे अपेक्षित आहे. त्यानंतर वाणिज्य आणि अर्थमंत्रालय या शिफारशीवर विचार करून योग्य तो निर्णय वेळोवेळी घेणार आहेत. भारत दागिन्यांची मोठ्या प्रमाणात निर्यात करतो. मात्र, सोन्याची आयात महाग पडत आहे. कारण सोन्यावर आयात शुल्क जास्त आहे. ते आयात शुल्क कमी करण्याची मागणी या क्षेत्राने अनेक वेळा केली आहे.