“मर्सिया’ दुसऱ्या; तर तिसऱ्या स्थानावर “मोठा पाऊस आला आणि…’
पुणे – “अरे आव्वाज कुणाचा’, “करंडक कुणाचा’, “चांगभलं’ आदी आरोळ्यांनी रविवारी सायंकाळी “भरत’चा परिसर दणाणला होता. निमित्त होते, पुरुषोत्तम करंडकाच्या पारितोषिक वितरणाचे.
यंदाचा प्रथम क्रमांकाचा करंडक अहमदनगर येथील न्यू कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयाच्या “लाली’ या एकांकिकेने पटकाविला. महाविद्यालयास सांघिक प्रथम पारितोषिकासह 5001 रुपयांचे रोख पारितोषिक, स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले; तर दुसऱ्या क्रमांकावर दापोली येथील फिशरी महाविद्यालयाच्या “मर्सिया’ एकांकिकेने आणि तिसऱ्या क्रमांकावर कुरूंदवाड येथील दत्त महाविद्यालयाच्या “मोठा पाऊस आला आणि…’ या एकांकिकांनी मोहोर उमटविली. प्रायोगिक एकांकिकेच्या पुरस्कारासाठी त्या गटातील एकही एकांकिका पात्र ठरली नाही.
महाराष्ट्रीय कलोपासकच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी स्पर्धेचे परीक्षक शाम जोशी, प्रवीण भोळे, शुभांगी दामले, संस्थेचे विश्वस्त अनंत निघोजकर आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी लेखनाकडे वळताना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरेपूर उपयोग केला पाहिजे, अशी अपेक्षा ज्येष्ठ नाटककार चं. प्र. देशपांडे यांनी व्यक्त केली. स्वत:ची सर्जकता टिकवून परिवर्तनवाद टाळला पाहिजे. नाटक हे मानवी संबंधांचेच असले पाहिजे. त्याची समज घेणे हे कलेचे कार्य आहे. लेखनातील परिपक्वता ही समाजात समताच आणते याकडे त्यांनी लक्ष वेधले.
नाटक ही अपरिहार्य सांघिक कला आहे. पूर्वीपासूनच नाटकाचा उपयोग समाजातील प्रश्न, समस्या, प्रथा मांडण्यासाठी झालेला आहे. मात्र, महाअंतिम फेरीमध्ये सादर झालेल्या एकांकिकांमध्ये बोटावर मोजण्या इतक्या एकांकिका वगळता आजच्या पिढीचे प्रश्न आणि समस्यांची मांडणी केली नसल्याचे जाणवले. सध्या नाटकांवर स्क्रीनचा प्रभाव पडत आहे, असे मत परीक्षक प्रवीण भोळे यांनी व्यक्त केले.
माणसाच्या जगण्याचा नमूना विचारात घेता लेखकाने लेखनपूर्व विचार स्वातंत्र्य वापरण्याची जास्त गरज आहे. “का लिहितो’ आणि आपले लिहिणे हे सर्वच माणसांसाठी आहे का’ हे विषय लेखकाच्या चिंतनात असणे आवश्यक आहे. आपण एखाद्या ठराविक गटासाठी लिहितो, हा लेखकाने विचार केला पाहिजे. “मी लिहितो का’ हे लेखकांनी आणि कलावंतांनी लक्षात ठेवले पाहिजे, असे देशपांडे यांनी नमूद केले.