शिवसेनेने भाजपच्या जखमेवर पुन्हा चोळले मीठ
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचा आज पहिला मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. तर दुसरीकडे 2019 हे वर्ष संपण्यास अवघा एक दिवस शिल्लक आहे. या दोन्ही घटनांचा मेळ साधत शिवसेनेने भाजपाच्या चार दिवसांच्या सत्ता स्थापनेच्या जखमेवर पुन्हा एकदा मीठ चोळले आहे. सरत्या वर्षाकडून काय शिकायला मिळाले, तर मित्राशी अहंकाराने वागू नये, दिलेला शब्द मोडू नये व अंधारात लपूनछपून सरकार बनवू नये, असे म्हणत शिवसेनेने भाजपाच्या जखमेवरची खपली पुन्हा काढली आहे.
मावळत्या वर्षाला निरोप देत आणि नव्या वर्षाचे स्वागत करताना शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून भाजपालाही खडेबोल सुनावले आहेत. नवे वर्ष जसे संकल्पाचे असते तसे जुने वर्ष बरेच काही शिकवणारे असते. मित्राशी अहंकाराने वागू नये, दिलेला शब्द मोडू नये, अंधारात लपूनछपून सरकार बनवू नये अशा अनेक गोष्टी मावळत्या वर्षाने शिकवल्या. सरकारकडे पाशवी बहुमत व विरोधक क्षीण असे चित्र मधल्या काळात दिल्लीत निर्माण झाले होते. मात्र, वर्षअखेरपर्यंत अगोदर महाराष्ट्र आणि मग झारखंडमधु भाजपाचे उच्चाटन झाले. मी सांगेन तीच पूर्व दिशा अशी उन्मत भूमिका घेणाऱ्या सत्ताधीशांना कसे शिंगावर घ्यायचे याचा राजमार्ग महाराष्ट्राने देशाला दाखवून दिला. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स इत्यादी सरकारी संस्थांचा गैरवापर करून सरकारे स्थापन करण्याचा प्रयोग महाराष्ट्रात अपयशी ठरला. शिवसेनेच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीचे सरकार महाराष्ट्रात सत्तेवर आले, असे शिवसेनेने म्हटले आहे.
देशातील सध्याच्या कलुषित वातावरणावरूनही शिवसेनेने केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे. 2019 हे वर्ष संपत असताना देशाची मरणासन्न अवस्थेत गेलेली अर्थव्यवस्था मात्र चिंता वाढवणारी आहे. उद्योगधंदे बंद पडत आहेत. बेरोजगारीने कळस गाठला आहे. तथापि कोमातील अर्थव्यवस्थेपासून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी एनआरसीसारखे तेढ निर्माण करणारे भावनिक विषय पुढे रेटले जात आहेत, असे आरोप शिवसेनेने केला आहे.
देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची आठवण नव्या वर्षात येणार असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. जगातील विकसित देशांच्या तुलनेत हिंदुस्थानची सर्वच क्षेत्रांतील पीछेहाट पाहून मिसाईलमॅन कलाम यांनी इंडिया 2020 : व्हिजन फॉर द न्यू मिलेनियम हे पुस्तक 1998 साली लिहिले होते. वीस वर्षांनंतरचा हिंदुस्थान कसा असावा आणि या वीस वर्षांत देशातील विविध क्षेत्रांत कोणकोणते बदल होणे आवश्यक आहे याचा लेखाजोखाच डॉ. कलाम यांनी अत्यंत दूरदर्शीपणे आपल्या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये मांडला होता. हा हा म्हणता वीस वर्षे सरली, पण कलामांनी पाहिलेला स्वप्नातील हिंदुस्थान आपण घडवू शकलो का हा चिंतनाचाच विषय आहे. येणारे 2020 हे वर्ष माजी राष्ट्रपती स्व. ए.पी.जे अब्दुल कलाम यांची प्रकर्षाने आठवण करून देणारे आहे.