मकरंद पाटील यांना डावलल्याने समर्थकांचे राजीनामे
मुंबई : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचा आज, सोमवारी विस्तार होत आहे. 36 मंत्र्यांचा मंत्रीमंडळामध्ये समावेश केला जाणार आहे. यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 13 आमदार मंत्रीपदाची शपथ घेतील अशी शक्यता आहे. मात्र, मंत्रीमंडळ विस्ताराआधीच राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये नाराजीनाट्याला सुरूवात झाली आहे.
आमदार मकरंद पाटील यांना डावल्यामुळे वाई, खंडाळा आणि महाबळेश्वरमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. लोणंद ,वाई, महाबळेश्वर नगरपालिकेच्या नगरसेवकांसह आठ जिल्हा परिषद सदस्य आज, सोमवारी आपल्या पदांचा राजीनामा देणार आहेत. नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांसह याठिकाणचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनेक पदाधिकारीही आपल्या पदांचा राजीनामा देणार आहेत. सोमवारी सुरुर येथील किसनवीरांच्या पुतळ्यासमोर सर्व जण आत्मक्लेश आंदोलनही करणार आहेत.
खासदारकी कराडला, मंत्रिपदही कराडला, आता सातारा जिल्ह्याचे नाव ही बदलून टाका, अशा शब्दात कार्यकर्ते नाराजी व्यक्त करत आहेत. किसन वीर आबांच्या पुतळ्यासमोर सोमवारी कार्यकर्ते आत्मक्लेश आंदोलन करणार आहे. लोणंद नगरपंचायतचे नगरसेवक आणि गटनेते योगेश क्षीरसागर, भुईंज जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण, राष्ट्रवादीचे खंडाळा विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष गणेश धायगुडे पाटील, खंडाळा तालुक्याचे राष्ट्रवादीचे सोशल मीडिया अध्यक्ष मोहसीन लतीफ पठाण यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
दरम्यान, राज्यातील महाविकासआघाडी (शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस) सरकारचा आज, सोमवारी दुपारी एक वाजता मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. विधिमंडळ परिसरातील पार्किंगच्या जागेत मुख्य स्टेज आणि त्याला लागूनच भव्य मंडप उभारण्यात आला आहे. याठिकाणी सुमारे 500 ते 700 आसनांची व्यवस्था करण्यात आली आहे. या मंडपामध्ये 12 पेक्षा जास्त स्क्रीन उभारण्यात आले असून विधिमंडळ परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.