– डॉ. खुशाल मुंढे
सध्या अवकाळी पावसाने हजेरी लावली असली तरी फायद्याऐवजी नुकसानच अधिक झाले. अनेक धरणे आणि जलाशयांमध्ये खूपच कमी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पाणीटंचाईची भयावह समस्या निर्माण झाली आहे.
आपल्या शेतीप्रधान भारत देशामध्ये पाणी आणि शेती यांचं एकाच नाण्याच्या दोन बाजूचं नातं दिसून येतं. त्या नात्यातील एक बाजू कुठेतरी टंचाईच्या दृष्टिकोनातून भयावह समस्या म्हणून उदयास येऊ लागली आहे. एकंदरीत तीन ऋतूंच्या माध्यमातून कालचक्र चालत असतं त्यातला उन्हाळा हा ऋतू सध्या आपल्याकडे चालू आहे आणि या ऋतूमध्ये पाणीटंचाईला फार मोठ्या प्रमाणात सामोरे जावं लागतं. ही पाणीटंचाई फक्त आपल्या राज्यात आपल्या देशातच आहे का? हा विचार केला तर तसं दिसून येत नाही.
ही समस्या अलीकडच्या काळात जागतिक स्तरावर जाणवू लागली आहे. सर्वसाधारणपणे गेल्या दहा वर्षांचा पाणीपातळीचा आढावा आपल्या देशाच्या काही राज्यांचा घेतला असता आंध्र प्रदेशात 22 टक्के, कर्नाटकात 29 टक्के, तामिळनाडू 35 टक्के, तेलंगणा 42 टक्के, केरळ 53 टक्के, महाराष्ट्र 34 टक्के एवढ्या प्रमाणात भूजल पातळीमध्ये कमतरता दिसून येते. याचा विचार केला असता भविष्यात पाणीटंचाईचं भयावह समस्येत रूपांतर व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे स्वतःपासून पाणी वापरावर बंधन घालून घेण्याचं काम केलं पाहिजे. वेगवेगळ्या स्तरावर पाणीटंचाईवर परिषदा घेऊन जनजागृती, उपाय यावर चर्चा केली पाहिजे. प्रत्येक राजकीय पक्ष ज्या पद्धतीने मतदारांना आपल्याकडे खेचून आणण्यासाठी प्रलोभने दाखविता, आश्वासने देता, जनजागृती करता त्याच दृष्टिकोनातून पाणीटंचाईच्या बाबतीत पाणी परिषदांच्या माध्यमातून जनजागृती करणे गरजेचे आहे. हे काम प्रत्येक पक्षाने, प्रत्येक सेवाभावी संस्थेने, प्रत्येक संघटनेने, प्रत्येक व्यक्तीने केले पाहिजे.
पाणीटंचाईला अनेक कारणे कारणीभूत असलेले दिसून येतात. त्यामध्ये एक वाढते जलप्रदूषण, गोड्या पाण्याच्या स्रोताची कमतरता, रासायनिक खते व औषधांचा अमर्याद वापर या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्याच पाहिजे. परंतु सध्या महाराष्ट्र किंवा देशाच्या स्तरावर विचार केला तर प्रचलित पाणी व्यवस्थापन पद्धती अत्यंत अकार्यक्षम दिसून येत आहे. जेणेकरून शासनाच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे व त्याची जागृती संवर्धन संरक्षण या गोष्टी प्राधान्याने करणे गरजेचे आहे. मार्च 2023 मध्ये न्यूयॉर्कमध्ये अर्थात यूएसएला जागतिक पाणी परिषद घेतली गेली. जेणेकरून त्या परिषदेच्या माध्यमातून जागतिक स्तरावरील पाणीटंचाईचा आणि पाणी व्यवस्थापनाचा विचार केला गेला. त्यावेळी असे ठरविण्यात आले की देशातील 70 टक्के पाणी हे शेतीसाठी वापरले जाते आणि 30 टक्के पाणी इतर उद्योगधंदे व पिण्यासाठी वापरले जाते. त्यामुळे या 70 टक्के पाण्याच्या वापराचा विचार होणे गरजेचे आहे.
अर्थात, जी पिके कमी पाण्यावर येतात त्या पिकांचे उत्पादन देशातील शेतकर्यांनी करावे, ही भूमिका त्या परिषदेतून मांडली गेली. ही भूमिका अत्यंत रास्त वाटते. कारण तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीसाठी कमी पाण्याचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादन क्षमता कशी वाढेल हाही विचार त्यामधून आला. त्याच बरोबर अनेक शेतकरी उत्पादन वाढीसाठी रासायनिक खतांचा आणि औषधांचा अतिवापर करतात. या अतिवापरामुळे जमिनीचा कस कमी होतोच त्याचबरोबर त्याचा परिणाम पाणी दूषित होण्यावर होतो. त्यामुळे पाणी व्यवस्थापन करत असताना ज्या पद्धतीने पश्चिम बंगाल, महाराष्ट्र या राज्यांमध्ये सर्वात जास्त पाणीसाठे आढळून येतात त्या ठिकाणी जलसंधारण संवर्धन आणि संरक्षण या बाबी पाळण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु तो प्रयत्नही सध्याच्या घडीला कुठेतरी कमी पडत आहे. त्यामुळे प्रत्येक राज्यांमध्ये योग्य त्या ठिकाणी पाणीसाठे तयार करून घेण्यासाठी जलसंधारणाची योजना राबविली पाहिजे.
जेणेकरून भविष्यात पाणी उपलब्ध नसल्यामुळे जीवन उद्ध्वस्त होणार नाही, ही काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. सर्वसामान्याने अर्थात स्वतः प्रथम दिवसभरात वापरावयाचे पाणी किती वापरावे, पिण्यासाठी योग्य पद्धतीने पाणी वापर किती करावा हे गणित ठरविले पाहिजे. जेव्हा आपण स्वतः या सगळ्या गणिताचं पालन करतो तेव्हा आपोआपच प्रत्येकजण पालन करण्याचा प्रयत्न करून या समस्येवर मात करण्यासाठी पुढाकार घेईल.
पाणी टंचाईच्या झळा ग्रामीण भागामध्ये जाणवत आहे. शहरी भागालाही बर्यापैकी पाणीटंचाईचा प्रश्न भेडसावत असतो. परंतु त्या ठिकाणी संबंधित प्रशासनाच्या माध्यमातून योग्य ते नियोजन करण्याचे काही प्रमाणामध्ये प्रयत्न केला जातो. प्रत्येकाने एक लक्षात घेतलं पाहिजे, ‘जल हैं तो कल हैं’ त्यामुळे सकाळी पाणी आल्यावर रस्त्यावर उगीचच पाइप घेऊन पाणी मारणार्यांनी, गाडी स्वच्छ असतानाही गाडी धुणार्यांनी, आंघोळ करताना पाण्याचा भरपूर वापर करणार्यांनी हे संकट लक्षात घ्यायला पाहिजे. आंघोळीसाठी पाण्याचा वापर जास्तीत जास्त 15 ते 20 लिटर या प्रमाणात केला पाहिजे. या सगळ्या गोष्टी प्रत्येकाने स्वतः पाळल्या तर या पाणीटंचाईच्या समस्येपासून आपणाला काहीसे दूर राहता येईल. त्यासाठी ‘पाणी वाचवा जग वाचवा’ हीच भूमिका तुमच्या मनामध्ये असू द्या.
भूगर्भातील पाणीपातळी खालावल्यामुळे भूगर्भात मोठ्या हालचाली होत आहेत. त्यातूनच भूकंपासारखे प्रकार आपणाला घडताना दिसत आहेत. महाराष्ट्राच्या मराठवाड्यामध्ये नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांत भूकंपाचा धक्का बसलेला आहे. असे प्रकार यापुढे होताना आपणाला दिसतील. अर्थात, ते त्सुनामी लाटेच्या माध्यमातून त्सुनामी वादळाच्या माध्यमातून आणि अशा या भूकंपाच्या माध्यमातून या समस्यांचं मूळ आपणाला पाणीटंचाईच आहे, असे दिसून येईल.