- बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची लगबग
पिंपरी – दिवाळी म्हटले की आनंद आणि उत्साह. मांगल्यपूर्ण दीपोत्सवाची भारतीय परंपरा राहिली आहे. सध्या करोनाचे सावट असले तरीही घरोघरी पारंपरिक पद्धतीने शनिवारी (दि. 14) लक्ष्मीपूजन करण्यात आले. व्यापार, उद्योगाच्या ठिकाणीही लक्ष्मीपूजनासाठी हाच उत्साह पाहण्यास मिळाला. करोनामुळे बहुतांश ठिकाणी नागरिकांनी फटाके न वाजवता उत्सव साजरा केला.
आज सकाळपासूनच शहरातील बाजारपेठांमध्ये लक्ष्मीपूजन साहित्य खरेदीसाठी नागरिकांची लगबग सुरू होती. लक्ष्मीपूजनासाठी लागणाऱ्या साहित्याची जुळवाजुळव करण्यात येत होती. सकाळी अभ्यंगस्नान करून घरोघरी महिलांनी घरासमोर आकर्षक रांगोळी काढली. दारांवर झेंडूची तोरणे बांधण्यात आली. विद्युतमाळा, आकाशकंदील आदी लावून घराला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
करोनाचे सावट असले तरीही दिवाळीचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. दिवाळीनिमित्त करण्यात आलेल्या फराळाच्या पदार्थांवर बालचमूंनी यथेच्छ ताव मारला. लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त सायंकाळनंतरच असल्याने त्या दृष्टीने व्यापारी वर्गाने आवश्यक तयारी केली होती. चोपड्या, रोजमेळ आदींची खरेदी करून ठेवली होती.
लक्ष्मीपूजनात लक्ष्मीमाता आणि गणपती बाप्पांच्या मूर्ती किंवा तसबिरीसह हळद-कुंकू, अक्षता, विड्याची पाने, सुपारी, श्रीफळ, लवंग, वेलची, धूप, कापूर, अगरबत्ती, दीपक, कापूस, धागा, पंचामृत (दही, दूध, तूप, मध, साखर), गंगाजल, गूळ, धने, पाच फळे, फुले, चंदन, सुकामेवा, लाह्या, बत्तासे, लाल वस्त्र, अत्तर, चौरंग, कलश, कमल पुष्प माला, शंख, आसन, पूजाथाळी, चांदीची नाणी, आंब्याची डहाळी, नैवेद्य, असे पूजा साहित्य आवश्यक मानले गेले आहे. त्या दृष्टीने आवश्यक पूजा साहित्याची खरेदी करण्यात आली होती. सायंकाळी या साहित्याची विधिवत मांडणी करून मुहूर्तानुसार लक्ष्मीपूजन करण्यात आले. त्यानंतर दिवाळीच्या शुभेच्छांची एकमेकांना देवाणघेवाण करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी यंदा फटाके वाजवायला बंदी आहे. तरीही बालचमूंनी कमी आवाजाचे फटाके वाजविले.
सोशल मीडियावरही शुभेच्छांचा वर्षाव
सोशल मीडियावरही दिवाळीच्या शुभेच्छांचा आज दिवसभर वर्षाव सुरू होता. फेसबुक, व्हॉट्सऍप, ट्विटर आदी माध्यमांद्वारे मित्र परिवार, नातेवाईक आदींना दिवाळीच्या शुभेच्छांची देवाणघेवाण करण्यात आली. ज्यांची प्रत्येक्ष भेट घेणे शक्य नाही त्यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधून शुभेच्छा देण्यात आल्या.
हस्तांदोलन टाळले
शहरातील नागरिक एकमेकांना शुभेच्छा देताना हस्तांदोलन न करता भारतीय परंपरेचा म्हणजेच हात जोडून नमस्कार करत होते. बहुतांश नागरिकांनी हस्तांदोलन करणे टाळले. कारण दिवाळीचा आनंद मनी असला तरी छुप्या पद्धतीने नागरिकांच्या मनात करोनाची धास्ती आहे. त्यामुळे होता येईल तेवढे नागरिकांनी सुरक्षित अंतर पाळत व ऐकमेकांच्या घरी न जाताच सोशल मीडियावरून संदेश पाठवत आपल्या अंतःकरणातील भावना व्यक्त केल्या. त्यामुळे करोनाचा संसर्ग टाळण्यास मदत होणार आहे.