नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सीमेवरील लोंगोवाला ठाण्यावर जाऊन जवांनासोबत संवाद साधला आणि त्यांना दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या. आपली दिवाळी जवांनांसोबत असल्यावरच पूर्ण होऊ शकते, मग ती हिमाच्छादित पर्वतावर असो वा वाळवंटात.
प्रत्येक भारतीयांच्या शुभेच्छा, आशीर्वाद आणि आकांक्षा सरहद्दीवरील सैन्यदलातील कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवल्या असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. वीरमाता आणि भगिनींना देखील पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या.
ज्या देशाची हल्ला करणाऱ्यांविरूध्द आणि घुसखोरांविरुध्द लढण्याची ताकद आहे, तोच देश सुरक्षित असतो. आंतरराष्ट्रीय साहचर्यात सकारात्मक स्थिती असली तरी आणि बदललेली समीकरणे लक्षात घेता, दक्षतेची आपल्या सुरक्षिततेत महत्वपूर्ण भूमिका आहे हे विसरता कामा नये. तसेच तत्परता हा आनंदाचा पाया आहे आणि यशाबद्दल आत्मविश्वास हे आपले सामर्थ्य आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
भारतीयांना शक्यतो करोना लसीची गरज पडणार नाही; ‘एम्स’च्या डाॅक्टरांचा दावा
आजचा भारत हा समजूतदारपणा आणि स्पष्टीकरणावर विश्वास ठेवतो परंतू आमची परीक्षा घ्यायचा प्रयास केल्यास, आमचा प्रतिसाद तितकाच उग्र असेल. भारत आपल्या राष्ट्रहिताबाबत कोणतीही तडजोड करणार नाही,हे जगाला माहित झाले आहे.
आज भारत दहशतवाद्यांच्या निर्मात्यांना त्यांच्या घरात जाऊन प्रत्युत्तर देत आहे. विस्तारवादी विचारधारेविरुध्द भारताने जोरदार आवाज उठविला आहे. संपूर्ण जग विस्तारवादी शक्तींमुळे त्रासून गेले आहे. अठराव्या शतकातील विकृत मानसिकतेचे हे प्रतिबिंब आहे, असेही ते म्हणाले.
आत्मनिर्भरता, व्होकल ते लोकल यावर पंतप्रधानांनी भर दिला. सैन्यदलात 100 हून अधिक शस्त्रास्त्रे आणि त्यांचे पूरक भाग आता आयात केले जाणार नाहीत. याबद्दल पंतप्रधानांनी सैन्यदलाचे अभिनंदन केले.
सैन्यदलासाठी गरजा पूर्ण करण्यासाठी जास्तीत जास्त स्टार्ट अप्स सुरू करण्याचे आवाहन मोदी यांनी देशातील युवकांना यावेळी केले. तसेच नवनिर्मितीला आपल्या रोजच्या जीवनात स्थान द्यावे. योग जीवनाचा भाग बनवावा आणि हिंदी, इंग्रजी याव्यतिरिक्त एकतरी भाषा शिकावी, असे आवाहना पंतप्रधानांनी जवानांना केले.
लोंगोवाला युध्दाचे स्मरण
लोंगोवाला युध्दाचे स्मरण करताना पंतप्रधान म्हणाले, हे युद्ध धोरणात्मक नियोजनबद्ध इतिहास आणि सैन्यदलाच्या शौर्यासाठी सदैव स्मरणात राहील. या युध्दाच्या वेळी पाकिस्तानचा कुरुप चेहरा उघडकीस आला, कारण त्यांच्या सैन्याने निरपराधी बांगलादेशी नागरिकांना घाबरून सोडले आणि त्यांच्या माता आणि भगिनींवर अत्याचार केले. पाकिस्तानने जगाचे लक्ष विचलीत करण्यासाठी पश्चिम सीमेवर आघाडी उघडली. परंतू आपल्या सैन्याने त्याला जशास तसे उत्तर दिले, असे पंतप्रधानांनी सांगितले.