पुणे – ‘सर्वसामान्य कुटुंबीयांची दिवाळी गोड करण्यासाठी गेली पस्तीस वर्षे लाडू-चिवडा उपक्रम राबवला जातो, हे स्तुत्य आहे. तर, देशप्रेम जपत सीमेवरील जवानांसाठी हा दिवाळी फराळ पाठवला जातो ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे,’ असे मत पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी व्यक्त केले.
दी पूना मर्चंट चेंबरच्या लाडू-चिवडा उपक्रमाचे उद्घाटन आमदार माधुरी मिसाळ आणि कर्णिक यांच्या हस्ते करण्यात आले. हा कार्यक्रम गंगाधामजवळील जयजिनेंद्र प्रतिष्ठान नाजुश्री सभागृहात पार पडला. त्यावेळी पणन संचालक केदारी जाधव, चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया, उपाध्यक्ष अजित बोरा, सचिव रायकुमार नहार, माजी अध्यक्ष प्रवीण चोरबेले, ईश्वर नहार, ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक, दिनेश मेहता आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमास चेंबरचे माजी अध्यक्ष वालचंद संचेती, राजेश शहा, दीपक बोरा, बाजार समितीचे संचालक अनिरुद्ध भोसले, विलास भुजबळ, करण जाधव, आशिष दुगड, श्याम लढ्ढा आदी उपस्थित होते. बाठिया म्हणाले, “35 वर्षांपूर्वी सुरुवातीला पाच हजार किलो लाडू चिवडा तयार केला होता. यंदा अडीच लाख लाडू चिवडा किलोचे लक्ष्य ठेवले आहे. लोकांना उपलब्ध करून देण्यासाठी विक्री केंद्रामध्येही वाढ केली आहे.’ कार्यक्रमाचे प्रास्ताविक रायकुमार नहार यांनी केले, सूत्रसंचालन उत्तम बाठिया यांनी केले.