इस्लामाबाद – पाकिस्तानच्या कैदेत असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या संदर्भातील खटल्याच्या सुनावणीसाठी पाकिस्तानमध्ये वरिष्ठ पिठाची स्थापना करण्यात आली आहे. इस्लामाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अथर मिनल्हा यांच्या अध्यक्षतेखाली न्या. अमर फारुख आणि न्या. मिलान गुल हसन औरंगजेब यांचा समावेश असलेल्या पिठाची स्थापना इस्लामाबाद उच्च न्यायालयाने केली आहे. या पिठासमोर जाधव यांच्या खटल्याची सुनावणी 3 सप्टेंबर रोजी होणार आहे.
भारताच्या दबावामुळे या वरिष्ठ पिठाची स्थापना करण्यात आली आहे. जाधव यांना भारतीय दूतावासाचे सहाय्य उपलब्ध व्हावे, यासाठी भारताकडून सातत्याने पाकिस्तानवर दबाव टाकण्यात येत होता. जाधव यांच्यासाठी भारताकडून वकील नियुक्त करण्यात यावा, यासाठी इम्रान खान यांच्या सरकारने भारत सरकारशी संपर्कही साधला आहे.
भारतीय अधिकाऱ्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी द्यायला हवी, असे मत पाकिस्तानमधील प्रसारमाध्यमांनीही मांडले आहे. मात्र, या संदर्भात अद्याप भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून कोणतेही अधिकृत मत व्यक्त करण्यात आलेले नाही.
या संदर्भात पाकिस्तानकडून अधिकृतपणे कोणतीही विचारणा झाली नसल्याचे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी म्हटले आहे.